वन्दे श्रीप्रभुसद्गुरुं गुणनिधिं सद्भक्तकल्पद्रुमं।
मन्दानां शरणं शरण्यममलं नाथं त्वनाथाश्रयम्।
यत्सत्ता वशजेन स्थावरभवो देहः सुचेष्टान्वितः।
सोऽयं वो विदधातु वाञ्छित फलं माणिक्यकल्पद्रुमः॥

ह्यावेळी अधिक महिन्यात (१८ सप्टेंबर ते १६ ऑक्टोबर २०२०) वरील प्रार्थना संध्याकाळी बरोबर सहाच्या ठोक्याला न चुकता, श्री ज्ञानराज माणिकप्रभूंच्या सुहास्य वदनांतून घराघरांतून ऐकू आली. ह्या प्रार्थनेबरोबरच मन क्षणांत माणिकनगरात श्रीजींच्या समोर संत्संगात जाऊन पोहोचायचं. रोजच संध्याकाळी सहा वाजण्याची आतुरता असायची.

अधिकमासात श्री विष्णूंच्या आराधनेचे विशेष महत्व आहे. अधिकस्य अधिकम् फलम् ह्या उक्तीप्रमाणे श्रीजींच्या ह्या अधिकमासाच्या विशेष प्रवचनमालेमुळे अधिक मासात अगदी सहज आणि सुलभपणे श्री कृष्णाचे अर्थात् श्रीविष्णूंचे अधिष्ठान घराघरांत स्थापित झाले. ज्या सद्भक्तांनी ह्या अत्यंत रसाळ व भावपूर्ण गीतानिरूपणाचे मनोभावे श्रवण केले असेल, त्यांच्या पदरी विशेष पुण्य सहजच पडले असेल.

ह्या गीताज्ञानयज्ञासाठी श्रीजींनी श्रीमद्भगवतगीतेतील अध्याय तेरावा (क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग योग ), अध्याय चौदावा (गुणत्रय विभाग योग ) आणि अध्याय पंधरावा (पुरूषोत्तम योग ) ह्या अत्यंत महत्वाच्या अध्यायांची निवड केली.

केवळ छापील शब्दरूप श्रीमद्भगवतगीता न वाचता श्रीमद्भगवतगीतेतील जे अत्यंत गुह्य ज्ञान श्रीकृष्णाने अर्जुनास सांगीतले, त्या ज्ञानाची सामान्यजनांस यथार्थ ओळख व्हावी, त्यातील गुढार्थ समजावा ह्या तीव्र तळमळीने श्रीजींनी ह्या श्रीमद्भगवतगीता ज्ञानयज्ञाची वेदी रचली. पौराणिक काळापासून ते अगदी आजकालच्या व्यवहारातील सम्यक उदाहरणे घेऊन, जी आबालवृद्धांना एनकेनप्रकारेण स्वतःशी जोडून पाहता येतील अथवा आपल्या रोजच्या जीवनांत घडणा-या छोट्याछोट्या गोष्टींत श्रीमद्भगवतगीतेचे सार किती व्यापकरीत्या सामावले आहे हे श्रीजींनी आपल्या अपार निरीक्षणांतून अगदी सोप्या भाषेत समजावले. ह्यांतून श्रीजींची कमालीची प्रतीभा , वाक्चातुर्य आणी निरीक्षणशक्ती उद्धृत होते.

श्रीजींच्या प्रवचनांतून वर नमूद केलेले तीन अध्याय आणि त्याचे सोदाहरण विवेचन अगोदरच झाले आहे आणि ते सर्वांसाठी Manik Prabhu ह्या युट्यूब चॅनेलवर उपलब्ध आहे, त्यामुळे त्यावर लिहणे येथे लेखनविस्तार भयास्तव आवरते घेतो. यद्यपि, समजण्यास अत्यंत गहन असा विषय समजविण्यासाठी श्रीजींनी आणी श्री माणिकप्रभू संस्थानाने मनस्वी मेहनत घेतली. वेगवेगळ्या चित्रांच्या माध्यमातून असलेले स्पष्टीकरण किंवा बल्बला होल्डर लाऊन प्रकाशमान करणे, अशा अनेक उदाहरणांतून त्या त्या संकल्पना, ते ते विषय (प्रकृती पुरूष भेद, त्रिगुण अवस्था आणि उत्तम पुरूष) सामान्य जनांना कायमचे लक्षात रहावे ही श्रीजींची अंतरीची तळमळ मुख्यत्वे अधोरेखित होते. वेदांताचा प्रचंड अभ्यास, सततचे मनन आणी निदीध्यास ह्यामुळे श्रीजींसारख्या अधिकारी विभूतींकडून श्रीमद्भगवतगीता समजणे हे आम्ही आमचे परमभाग्य समजतो.

ह्या गीताज्ञानयज्ञाच्या अनुषंगाने श्रीजींच्या काही गोष्टींचे निरीक्षण केले व ते येथे नमुद करावेसे संयुक्तीक ठरेल.

१. वेळेचे महत्व – रोज ठराविक वेळी न चुकता हजेरी लावणे
२. परमेश्वरी कार्याचे निर्वहन: काही प्रवचनादरम्यांन श्रीजींची प्रकृती ठीक नव्हती. खोकल्याचा त्रास जाणवला, पण परमात्म्याने जे कार्य मला सोपवले आहे, ज्याची प्रेरणा मला झाली आहे, त्याचे निर्वहन मी माझे आद्य कर्तव्य समजतो. ह्या देहापेक्षा त्या परमतत्वाची प्रतिष्ठा, आज्ञा महत्वाची, हा श्रेष्ठतम भाव विशेष जाणवला.३. कोणाचेही नाव न घेता, योग्य तेवढा तपशील सांगून, जेणेकरून समोरच्याला त्या प्रकरणाचा अंदाज यावा, त्या प्रसंगातून एखादा अवगुण बरोबर अधोरेखित करणे तेही नामोल्लेख टाळून, हा ही अत्यंत गरजेचा गुण श्रीजींकडून घेण्यासारखा आहे४. परमात्मा सर्वांमध्ये एकच आहे हे तत्व जाणून ह्या प्रवचनमालेसाठी संस्थानातील ज्या ज्या दृश्य अदृश्य जणांनी मदत केली त्या सर्वांना कौतुकाची दिलेली थाप हा श्रीजींच्या मनाचा मोठेपणा दर्शवितो. कधीकधी हजारो लाखो रूपयांच्या पुरस्कारांपेक्षा संस्थानाच्या व्यासपीठावरून श्रीजींच्या मुखांतून मिळालेली शाबासकी सामान्य जनांस, सद्भक्तांस कृतार्थ करून सोडते. माणसे जोडण्याची कला ह्या प्रवचनांदरम्यान शिकता आली.
५. एखादा कंटाळवाणा विषयाला (with less glamour quotient) सध्याच्या चर्चित प्रकरणाची फोडणी देऊन तो रंजक बनविण्याची श्रीजींची हातोटीही वाखाणण्याजोगीच.
६. श्रीजींना साधारणतः भक्तांसमोर प्रवचन करण्याची व समोरून येणा-या प्रतिसादावर तो विषय फुलविण्याची सवय आहे. परंतु सद्यपरीस्थितीत समोर कोणीही नसताना श्रीजींनी कधीकधी एक श्र्लोक एक दीड तासही चालवला. ब-याचदा ते म्हणत कमेंट बाॅक्समध्ये प्रतिसाद द्या. मी माझ्या परीने तुम्हाला समजवतोय पण ते तुम्हाला समजतेय ना, ही पराकोटीची कळकळ एका अत्युच्य शिक्षकाची गुणवत्ता अधोरेखित करते.
७. सादरीकरण – अवतीभवतीचं वातावरण, पाठीमागचं देवघर, वेळेचे योग्य नियोजन, विषयाला अनुरूप वेशभूषा, शब्दांमधील चढउतार, प्रश्न विचारायची विशीष्ट पद्धत, मध्येच खळखळून येणारे हास्य, सर्व धर्मांचा समान आदर ह्या मुळे श्रीजींची प्रवचने आगळी आहेत, वेगळी आहेत. एकमेवाद्वितीय आहेत.
८. सखोल अभ्यास – केवळ प्रवचन द्यायचे म्हणून नाही तर त्या अनुषंगाने येणारे श्रोत्यांचे प्रश्न, गीतेतील श्लोकांना पुरक वेदोपनिषदांतील मंत्र, श्लोक,ओव्या न पाहता कंठस्थ असणे हे श्रीजींच्या विद्वत्ताप्रचुरतेचे प्रमाण होय. कठोपनिषद, तैतरीय, मंडूक उपनिषदांतील श्लोक, ज्ञानेश्वरीतील ओव्या, तुकारामांचे अभंग ह्या कंठस्थ असणं हे श्रीजींचे असामान्य व्यक्तिमत्व उद्धृत करतं.
९. शेवटच्या दिवशी भजनाच्या दिवशी श्रीजींच भावूक होणं त्यांची परमात्म्याप्रती असलेली प्रीती अन् एकरूपता दर्शवते.

ह्या आणि अशा अनेक निरीक्षणांना अनुभवत, श्रीजींच्या सुहास्य वदनातून पाझरणारे ज्ञानामृत कान तृप्त होईस्तोवर श्रवण करणं ही एक अपूर्व पर्वणीच. ह्या परमपुण्यपावन सोहळ्याचे साक्षीदार होता आले हे आमचे महाभाग्यच.

ह्या प्रवचनमालिकेमुळे सामान्य जनांना निश्चितच श्रीमद्भगवतगीतेप्रती कुतुहल निर्माण होऊन वाचनाची, समजण्याची निश्चितच प्रेरणा मिळेल, ज्यांनी आधी वाचलीय अशांना त्याचा अर्थ अधिक सुस्पष्ट होईल असा आशावाद व्यक्त करतो.आमचा अधिकमास ख-या अर्थाने सार्थकी लावल्याबद्दल श्रीजींचे अत्याधिक आभार, श्री माणिकप्रभू संस्थानाचे आभार व अभिनंदन.

श्रीजींच्या अंतस्थ तळमळीने प्रज्वलीत झालेल्या व वेदांताच्या सम्यक ज्ञानाने घातलेल्या आहुतींनी धडाडलेल्या, ह्या गीताज्ञान यज्ञात आमच्यातील अज्ञान जळून जाऊन, ह्या गीताज्ञानयज्ञाची धग आमच्यात कायम राहो, ह्या गीताज्ञानयज्ञातील शब्दरूपी विभूतीने आमच्या अंतरातील परमात्मा तत्वाची जाणीव नित्य रहावी व त्याची खरी ओळख आम्हा सामान्य जनांना व्हावी ह्या प्रभुचरणांची सप्रेम विनंती. श्री माणिकनगरातून उगम पावणा-या व श्रीजींच्या विद्वत्ताप्रचूर विवेचनाने नित्य प्रवाहित होणा-या परमपवित्र ज्ञानगंगेमध्ये आम्हांस नित्य डुबकी मारून आमचे अज्ञान धुवून जावो ह्या प्रभुचरणी पुनःश्च लडिवाळ विनंतीसह जय गुरू माणिक.

 

[social_warfare]