ठाणे व्याख्यानावर भक्तजनांची प्रतिक्रिया

ठाणे नगरीच्या पाचपाखाडी येथील श्री ज्ञानेश्र्वर मंदिर मध्ये निवृत्तिनाथ सभागृहात १७ ते २१ मे दर्म्यान श्री सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांनी गीतेच्या सोळाव्या अध्यायावर केलेल्या प्रवचनावर सद्भक्तांकडून आलेल्या काही प्रतिक्रिया…

श्रीमती जिज्ञासा पालकर, मुंबई

 

श्री संजय ईटकरकर, मुंबई

 

चि. विहान खोपकर, मुंबई

 

श्रीमती निधि चित्रे

 

श्री विजय महाजन, मुंबई

श्री राजन वागळे, ठाणे

 

कु. तनिषा प्रणिल सावे, ठाणे

 

श्रीमती सुनीता पाटिल, मुंबई (भाग – २)

श्रीमती सुनीता पाटिल, मुंबई (भाग – १)

 

श्रीमती सुवर्णा काणे, मुंबई

 

श्री किशोर धामोरीकर, मुंबई

 

श्री राजेंद्र फणसे, मुंबई

 

श्रीजींच्या प्रवचनावर श्रोत्यांची प्रतिक्रिया

ठाणे नगरीच्या पाचपाखाडी येथील श्री ज्ञानेश्र्वर मंदिर मध्ये निवृत्तिनाथ सभागृहात १७ ते २१ मे दर्म्यान श्री सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांनी गीतेच्या सोळाव्या अध्यायावर केलेल्या प्रवचनावर सद्भक्तांकडून आलेली काही प्रतिक्रिया…

पाचपाखाडी येथील ज्ञानदेव सेवा मंडळाचे निवृत्तीनाथ सभागृहात तारीख १७ ते २१ हे ५ दिवस गीतेतील १६ व्या अध्यायावर परम पूज्य ज्ञानराज माणिकप्रभुंचे निरूपण झाले. महाराजांची, एखादा गहन विषय सोपा करून सांगण्याची हातोटी फारच उत्तम आहे. उदाहरणे देतांना अगदी रोजच्या व्यवहारातील देतात त्यामुळे विषयाचे आकलन पटकन होते. ‘ मला देव भेटेल का?’ या प्रश्नाचे उत्तर त्यांनी तीन टप्प्यात दिले. म्हणजे हो,हो,नाही. म्हणजे कर्म व भक्ती मार्गाने गेले तर भेटेल परंतु ज्ञानमार्गाने त्याचे उत्तर नाही कारण ज्ञानमार्ग म्हणजे स्वरुपाचे ज्ञान होणे म्हणजेच देवाची भेट होणे. – श्री प्रकाश गाडगीळ, मुंबई

‘‘दुःख अभावात नाही, अभावाच्या अनुभवात असतं” आणि “आनंद कामना पूर्तीत नाही, कामनांचा क्षय होण्यात असतो” ही वाक्ये आणि त्यांच्या जोडीला दिलेली उदाहरणे मी कधीही विसरणार नाही. कार्यक्रम अतिशय उत्तम झाला. २ दिवसच येता आलं पण आल्यावर तिथून उठावसं वाटलं नाही. गुरुजींनी अगदी सोप्या भाषेत सांगितलं म्हणून कळू शकलं. गुरुजींना भेटण्याचा आणि त्यांची अमृत वाणि ऐकण्याचा योग पुन्हा येईल अशी इच्छा.इ – श्री चिन्मय प्रभुघाटे, मुंबई

कार्यक्रम अतिशय छान व अप्रतिम झाला. सर्व नियोजन अगदी शिस्तबद्ध होते. महाराजांचं प्रवचन फारच सुंदर व कधीच संपू नये असे वाटत होते. – श्री गिरीश संझगिरी, मुंबई

‘मला देव भेटेल का’  या विषयावरील महाराजांचे प्रवचन ऐकताना दोन-अडीच तास कुठे गेले ते कळलंच नाही.अतिशय सोप्या शब्दात,हसत-खेळत, रोजच्या व्यवहारातील उदाहरण देत महाराजांनी श्रोत्यांच्या पदरात बरंच काही टाकलं. यातील दोन-चार गोष्टींचा उल्लेख केल्याशिवाय रहावत नाही.परमात्मा बाहेर कुठेही नाही,तो आपल्या आतच आहे,त्यामुळे मला अमुक- तमुक जमत नाही असं म्हणणं म्हणजे त्या परमात्म्याला कमी लेखणं आहे. आत्म्याचे अधिष्ठान म्हणजे जणू सिनेमाचा पडदा! जसं पडद्यावर काही घडलं तरी तो त्यापासून निर्लेप असतो तसं आत्माही शरीराच्या व मनाच्या सुख दुःखा पासून अलिप्त आहे.. ती सुखदुःखं या देहापुरती आहेत याची सतत जाणीव हवी. जपाच्या माळेतील मणी म्हणजे संसारातील माया आणि त्या मायेपाठील न दिसणारा धागा म्हणजे परमात्मा. जप करताना त्या धाग्याला झालेला स्पर्श म्हणजे परमात्म्याच्या अस्तित्त्वाची जाणीव! माणूस नेहमी स्वतःवर प्रेम करतो हे सिद्ध करण्यासाठी सांगितलेली  सासूच्या हिऱ्याच्या कुड्यांची गोष्ट. भगवंताचं एकदा जरी मनोभावे स्मरण केलं तरी तो वेळोवेळी आपल्यासाठी धावून येतो हे पटवून देण्यासाठी सांगितलेलं गुगल सर्च चं उदाहरण. म्हणजे एकदा एखाद्या गोष्टीचा सर्च घेतला की शोधकळ दाबताच तीच गोष्ट पुन्हा पुन्हा कशी समोर येते याचा दिलेला दाखला. सहज लक्षात राहिलेल्या या काही गोष्टी. हसतखेळत ज्ञानामृत देणारा हा अनुभव दिल्याबद्दल ठाण्याच्या श्रीमाणिकप्रभु सेवा मंडळाला शतशः धन्यवाद. – श्रीमती संपदा वागळे, मुंबई

गीतेच्या सोळाव्या अध्यायाच्या प्रत्येक श्लोकाविषयी सविस्तरपणे समजावून सांगण्यात महाराजांचा हातखंडा होता याबद्दल माहिती होती. यापूर्वी दोन दिवसांत महाराजांनी सोळाव्या अध्यायातील पहिल्या तीन श्लोकांबद्दल भक्तांना सविस्तरपणे समजावून सांगितले होतेच; त्यामध्ये दैवी संपत्ती (गुण) विषयी विवेचन केलेले होते. आज पुढील चार ते सात श्लोकांविषयी महाराजांनी सविस्तरपणे समजावून सांगितले. त्यामध्ये आसुरी संपत्तीचा उल्लेख होता. दंभ, दर्प, अभिमान, क्रोध, अज्ञान अशा सामान्य माणसांच्या अंगी असलेल्या आसुरी गुणांविषयी महाराजांनी साध्या सोप्या भाषेत विवेचन केले, इतकेच नव्हे तर दंभ, दर्प, अभिमान यांचा अर्थ अहंकार जरी असला तरी त्यामधला फरकही महाराजांनी खूप सुंदर रित्या समजावून सांगितला. शिवाय  जीवनातील छोट्या छोट्या घटना, प्रसंगांचा दाखला देत अधूनमधून हसतखेळत सुसंवाद साधत गीतेतील अध्यायांत गुंगवून टाकले. अर्थात मलासुद्धा महाराजांनी त्यांच्या या दोन तासांच्या प्रवचनात खिळवून ठेवले एव्हढे मात्र निश्चित! श्री विजयकुमार पवार, ठाणे

गुरुवारी माणिकनगरच्या महाराजाना पाहिले आणि गीतेच्या सोळाव्या अध्यायातील काही श्लोकांचे अर्थासहित विवेचन ऐकायचे भाग्य प्राप्त झाले. आध्यात्मिक ज्ञान किती सोप्या रीतीने त्यांनी प्रापंचिक समुदायाला रोजच्या उदाहरणावरून समजावून सांगितले. दोन तास रंगलेला हा कार्यक्रम प्रत्येकालाच अंतर्मुख करून गेला. असे गुरूंकडून आध्यात्मिक मार्गदर्शन घेण्याचे भाग्य प्रत्येकास प्राप्त होवो. – श्रीमती वेत्रवती देसाई – दहिसर, मुंबई

प.पू. श्री सद्गुरु ज्ञानराज माणिकप्रभु महाराजांच्या दैवी ,प्रासादिक  वाणीतील दैवी व आसुरी संपत्तीचे सखोल  उदबोधन भाविकांच्या पारमार्थिक वाटेवरील अखंड ज्ञानदीप आहे. त्याचा प्रकाश आम्ही सदैव प्राप्त करून घ्यावा. कालचा ‘‘मला देव भेटेल का?’’ हा प्रवचनाचा विषय भाविकांचा खूप उत्सुकतेचा ! महाराजांनी आपल्या सिद्ध वाणीतुन आमचे पूर्ण समाधान केले व देव आहेच व प्रयत्नांती तो भटतोही हे ठामपणे सांगितले. – श्री वसंत कुलकर्णी, मुंबई

वेदांत सप्ताह भाग सहावा

काल रात्री उशीरापर्यंत जागून श्रीजींचे प्रवचन ओवीबद्ध केले. डोळा लागला तेव्हा घड्याळाचा काटा दीडकडे झुकला होता. प्रसादस्वरूप मिळालेला निशिगंधाचा हार उशाशी ठेवून, गोड आणि मंद सुगंधी लहरींसंगे निद्रादेवीच्या अधीन झालो. सकाळी चहाच्या गलक्याने जाग आली. हवेत सुखद गारवा होता आणि त्या गारव्यात गरम चहाचे घुटके हवेहवेसे वाटत होते. आज दोन कप चहा घेतला. एव्हाना इतर भक्तांचा पारायण झाल्यावर, बिदरच्या झरणी नरसिंहला जाण्याचा बेत चालला होता. आपल्या अवतार काळात श्रीमाणिक प्रभुंनी येथे आपले विश्वरूप प्रकट केले होते. श्रीगुरुचरित्रातील पापविनाशी तीर्थही येथेच आहे. दहाएक वर्षांपूर्वी मीही या स्थानी जाऊन आलो आहे. आठवणीच्या पुस्तकातील पाने चाळवली गेली. चहा घेऊन छानपैकी नामस्मरणाला बसलो. यथावकाश स्नान करून, नाश्ता आटपून रोजच्या शिरस्त्याप्रमाणे श्रीप्रभु मंदिरात पारायणासाठी येऊन बसलो. पावणे नऊच्या सुमारास वाचनाला सुरुवात केली. आज पारायण यादरम्यान भरपूर माकडे औदुंबरवर उड्या मारत होती. औदुंबराखाली आमचे पारायण चालू आहे, ह्याचा त्यांना काहीच फरक पडत नव्हता. अगदी मुक्तपणे ती माकडे मंडपावर, मंडपावरून औदुंबरावर औदुंबरावरून भिंतीवर उड्या मारत आपल्याच मस्तीत दंग होती. पण त्या मुक्या जीवांनी कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास दिला नाही. अर्ध्या तासाच्या मुक्त क्रीडेनंतर ते आल्या वाटेने निघून गेले. आजच्या पाचव्या दिवसाच्या पारायणाचे अध्याय मोठे रसाळ होते. माणिक नगरची स्थापना, चोर खड्ड्यात पडल्याची कथा, माझ्या अत्यंत जवळची तुकाराम धनगराची कथा, टर्रा हुसैन खानाचे गर्वहरण, नाना नाच्याची कथा, श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचा श्री माणिकप्रभुंशी असलेला हृदयसंबंध पारायणादरम्यान अनुभवताना, अंतरात एकापाठोपाठ आनंदलहरी उचंबळून येत होत्या. त्या त्या दिवसाचे पारायण झाल्यावर मन अगदी कृतार्थतेचा अनुभव करत असतं आणि ती अनुभूती अनुभवणे अत्यंत सुखावह असते.

पारायणानंतर श्रीप्रभुचे मन भरुन दर्शन आणि नंतर प्रदक्षिणा हा आता रोजचाच शिरस्ता झाला होता. आज गुरुवार होता. भक्तकार्यकल्पद्रुम श्रीगुरू आज अत्यंत  लोभस दिसत होता. श्रीप्रभुची नित्य सजावट करणाऱ्या समस्त ब्रह्मवृंदाचे खरोखर कौतुक करावयास हवे. श्रीप्रभुसमाधीवरील महावस्त्र आणि रेशमी शाल ह्याचा सुंदर मिलाफ आणि त्यावर विविधरंगी फुलांची सजावट आपणांस नित्य अनुभवायला मिळते. आज हिरव्या रंगाच्या वस्त्रसाजावर, अबोलीचा शेंदरी आणि कागड्याचा शुभ्र साज अत्यंत चित्ताकर्षक होता. दोन्ही बाजूंनी निशिगंध झारी घेऊन सुगंध शिंपडत होता. तुळशी माळ, बोरमाळ, रुद्राक्ष माळ अशा अनेक माळा गळाभर रुळत होत्या. मोत्यांची सहा पदरी माळ श्रीप्रभुच्या सौंदर्याला अधिकच खुलवत होती. माणिकरत्नाने मढवलेली सुवर्णपुष्प आणि वर लावलेला रत्नजडित नक्षीदार शिरपेच श्रीप्रभुच्या वैभवाची साक्ष देत होते. श्रीप्रभु समाधीवरील चांदीच्या छत्रावरुन सोडलेल्या झेंडूच्या माळा वातावरणातील मंगलतेत अधिकच भर घालत होत्या. असा हा लडिवाळ श्रीप्रभु गाभाऱ्यात सुखासनी विराजमान होता. श्रीप्रभु दर्शनात व्यत्यय नको म्हणून डोळ्यांच्या पापण्यांनाही मिटू नका असे बजावले. खरेच, अवतार काळी श्रीप्रभु किती लाघवी दिसत असेल? कुणाची नजर लागू नये म्हणून माझीच बोटे कानाजवळ नेऊन मोडली.

आज पुन्हा श्रीजींच्या घरी नित्यपूजेचा आनंद घेतला.‌ माध्यान्हपूजेचे तीर्थ मिळणे हा ही आपल्या भाग्याचा क्षण. श्रीप्रभु कृपेने हे क्षण माणिकनगरातील वास्तव्यात अनेकदा येतात. कधीकधी आपल्यालाच आपल्या भाग्याचा हेवा वाटतो. पूजेनंतर श्रीजींनी दहा मिनीटांत प्रवचनाला येतो म्हणून सांगितले.

ताक पिऊन श्रीनृसिंह निलयमध्ये स्थानापन्न झालो. पुढील पाचच मिनिटांत श्रीभक्तकार्याचा गजर झाला आणि श्रीजींची स्वारी व्यासपीठावर स्थानापन्न झाली. गुरुपरंपरेस वंदून, श्री भगवद्गीतेस नमून आतापर्यंतच्या सर्व दिवसांचा झटपट आढावा श्रीजींनी घेतला. एक उत्तम वक्ता म्हणून श्रीजींची ही गोष्ट मला अत्यंत भावते. समस्त उपस्थितांना मागील दिवसांत ग्रहण केलेल्या ज्ञानाची उजळणी करून, आजच्या दिवसाच्या विवेचनासाठी ते आपणांस सर्वार्थाने तयार करतात. श्रीजींनी आज १५ ते १९ असे पाच श्लोकांवर भाष्य केले. गीतेतील प्रत्येक अध्यायास योग म्हटले गेलाय आणि जी क्रिया परमात्म्याशी संबंधित असते त्यास योग म्हणतात. परमात्म्याने मानवास दिलेली सर्वात महत्त्वाची शक्ती म्हणजे वाणी… स्नान, अलंकार, साजशृंगारापेक्षा केवळ वाणी हाच मानवाचा श्रेष्ठ अलंकार होय. एखाद्याबद्दलची धारणाही वाणीनेच होते. वाणीनेच रामायण, महाभारत घडले. आपल्या वाणीने कोणालाही दुखवू नये. वाणीत आणि बुद्धीत सामंजस्य का आणि कसे असावे, वाणी तपासायच्या चार चाचण्या अशा समुपदेशनपर त्या त्या श्लोकाच्या शाखा श्रीजींच्या रसाळ वाणीतून विस्तारत होत्या. पुढे मानसिक तप, कायिक तप आणि मानसिक तप म्हणजे काय, हे समजावताना मनास माकडाची उपमा देली. त्यातून मनाची चंचलता कशी माकडासारखी असते, मौन म्हणजे काय आणि ते का गरजेचे आहे? तप म्हणजे काय? तप हे साध्य आहे, साधन नव्हे… गीता यज्ञ धडधडत होता. पुढे अध्यायाच्या अनुषंगाने सात्विक, राजसिक आणि तामसिक तपाचे स्पष्टीकरण देताना महाभारतातील धृष्टद्युम्नामाची कथा सांगितली.गीतेचा भावार्थ उपस्थितांना समजवून देताना श्रीजी शर्थीचे प्रयत्न करतात. विषय सुलभ करताना अनेकविध उदाहरणे देतात.‌ पुराणातील, व्यवहारातील अनेक दाखले देताना, तो तो विषय प्रत्येकाला आकलनीय कसा होईल, हेही श्रीजी अत्यंत आत्मियतेने पाहतात. अलीकडच्या काळात असे उत्तम शिक्षक आणि शिकवण्याची कला हळूहळू कमी होत चालली आहे. एखाद्या विषयाचा उहापोह करताना श्रीजी अनेक उदाहरणे देतात पण विषयाचा मूळ गाभा कधी सुटत नाही. वृक्ष जरी बहरला, त्याच्या अनेक शाखांचा विस्तार जरी झाला तरी मूळ मात्र जमीनीला घट्ट पकडून असते, श्रीजींच्या प्रवचनाची पद्धत अशीच काहीशी आहे.‌ श्रीजींच्या विवेचनातून होणाऱ्या एखाद्या विषयाच्या आकलनाबरोबरच त्यांच्या प्रवचन पद्धतीतून, त्यांच्या देहबोलीतून खूप काही शिकण्यासारखे आहे. प्रत्येकाने आपल्या आवडी, निवडी आणि सवडीनुसार घ्यावे. भक्तकार्य ब्रीदावलीचा जयजयकार होऊन आजच्या गीतायज्ञातील आहुत्या पूर्ण झाल्या.

श्रीप्रभुचा महाप्रसाद घेऊन यात्री निवासावर आलो. आजच्या प्रवचनाच्या ओव्या लिहून‌ काढल्या. श्रीमाणिकनगरात आपण सतत श्रीप्रभुच्या अनुसंधानात राहतो, हे ही ह्या स्थानाचे एक वैशिष्ट्य आहे. आज पुन्हा सायंकाळी श्रीप्रभुमंदिरात आलो.  श्रीप्रभुमंदिराच्या कळसाच्या पाठी पश्चिमेला रंगाची मुक्त उधळण होत होती. चैतन्याची अनुभूती श्रीप्रभु वेगवेगळ्या प्रकारे आपणांस नित्य देत राहतो. आपण केवळ साक्षीभावाने अनुभवत राहावं. औदुंबराखाली बसून‌ सायंकाळी पश्चिमेला होत असलेला चैतन्याचा हा अद्भुत खेळ हृदय पटलावर कायमचा कोरला गेलाय. भक्तकार्य झाल्यावर आज कोल पाहायला आलो. आज बाळगोपाळ क्रीडा विशेष रंगली. सुर, ताल आणि पदलालित्याचा हा खेळ आपणांस एका वेगळ्या विश्वात घेऊन जातो. हा खेळ पाहताना मनास होणाऱ्या आनंदाच्या भरात मन हळूच, हा खेळ सुरू करणाऱ्या श्रीमार्तंड माणिकप्रभुंच्या चरणी कृतार्थतेने लीन होत होते. कोलनंतर महाप्रसाद घेवून श्री प्रभु मंदिरात भजन आणि प्रवचनासाठी लवकर येऊन बसलो. आज गुरुवारचा हिरवा रंग होता. श्रीप्रभुसमाधीसमोर आनंदमंटपात श्रीजींची हिरव्या रंगाची गादी अत्यंत शोभिवंत दिसत होती. श्रीजींनीही आज हिरव्या रंगाचा पोषाख धारण केला होता. आज प्रवचन-भजनाआधी आरती झाली, गुरुवारचे अष्टक झाले. गुरूवार आणि शनीवारी  गुरुवारी भजनाच्या आधी आरती असते. सर्व आरत्या व गुरुवार-शनिवार चे अष्टक झाल्यावर मग प्रवचन-भजन इ. ला सुरुवात होते. वर्षभरात गुरुवारची व शनिवारची आरती दुपारी ४ ला होते. मात्र वेदांत सप्ताहात रात्री भजनाला लागून, भजनाच्या आधी होते. आजच्या प्रवचनासाठी गुरुवारचे धरीयेले गे माय श्रीगुरुचे पाय… हे श्रीमाणिक प्रभुंचे गुरूभक्तिपर पद होते. गुरूवारच्या दिवशी, श्रीगुरूच्या संजीवन समाधीसमोर, गुरूच्या तोंडून, गुरुभक्तीचे पद ऐकणे हा विशेष योग होता. संपूर्णपणे शरणागत झाल्यावर, श्रीगुरु आपल्यावर नित्य बरसत राहतो आणि त्यात असे नखशिखांत भिजणे अत्यंत सुखावह असते. आजही सुर-तालांची मैफिल भजनादरम्यान सुरेख रंगली. आधीच श्रीप्रभु पदे इतकी गोड आणि रसाळ आहेत आणि त्यात मिसळलेला हा शास्त्रीय सुरतालांचा गोडवा चित्तवृत्तीला समाधानाच्या परमोच्च शिखरावर नेऊन ठेवत होता. शेजेची पदे म्हटली गेली त्यावेळेस कुरमुरे-खोबऱ्याचा प्रसाद वाटला गेला. रात्री भजनवाल्यांना श्रीजींनी प्रेमपूर्वक आशीर्वाद दिला. भजनाची सांगता होताना कमलवदनी हे अमृता भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा… ह्या पदाच्या लाटा श्रीप्रभुमंदिर परिसरात एकावर एक आदळत होत्या. आजही भजनानंतर चिवडा, मैसूर पाक, आईस्क्रीम असा महाप्रसाद वाटला गेला. यात्री निवासाकडे पावले वळताना मध्यरात्री बाराच्या सुमारास वातावरणातील गारवा आईस्क्रीमची लज्जत अधिकच वाढवित होता…

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग पाचवा

आज श्रीजींची पाद्यपूजा करावयास मिळणार होती त्यामुळे, अगदी पहाटेच जाग आली. स्नानादी कर्मे उरकून छतावर गेलो. आजचीही पहाट प्रसन्न होती. निलगिरीच्या झाडांवर बसलेले दोन मोर मन वेधून घेत होते. मधूनच त्यांचा केकारव पहाटेच्या नीरव शांततेचा भंग करत होता. पूर्वेला क्षितिजावर सूर्यनारायणाची शेंदरी छटा आकर्षक वाटत होती. चहा घेऊन रूम मध्ये आलो. पाद्यपूजेसाठी मला हार हवे होते म्हणून सकाळी साडेसातच्या सुमारास मी एसटी स्टॅंडवर गेलो. हुमणाबादेत व्यवहार थोडेसे उशिराच चालू होतात.  काल संध्याकाळीच एका फुलवाल्याला हारासंबंधी सांगून ठेवले होते. त्यानेही निशिगंधाचे ताजे हार बनवून ठेवले होते. संपूर्ण हारांवर मधमाशांचा घोळका होता. ज्या शिताफीने त्या फुलवाल्याने मधमाशांना हटवले, ते पाहून मला गंमत वाटली. प्रत्येक ठिकाणी पुस्तकी ज्ञानच कामी येते असे काही नाही. अनुभवांतून खूप काही शिकता येते.  तुम्ही शांत उभे रहा, त्या तुम्हाला काहीही करणार नाहीत, असे खास हैदराबादी हिंदीत म्हणाला.‌ मनासारखे हार मिळाल्यामुळे मीही खुश झालो. बाजूलाच नंदिनी डेअरीतून पेढे मिळाले. श्रीफळ फळे घेऊन परतीच्या वाटेवर एका दुचाकीस्वाराला हात दाखवला आणि त्याच्या सोबत यात्री निवासावर आलो.  पुन्हा स्नान उरकून नाश्ता उरकून पारायण करण्यासाठी श्रीप्रभुमंदिरात आलो.

आज श्रीप्रभुचरित्र वाचताना खूपदा डोळ्यांच्या कडा अलगद ओलावल्या. पारायणकाळात दर दिवसागणिक श्रीप्रभुशी आपली नाळ इतकी घट्ट होत जाते की आपण त्या त्या कथानकात आपण प्रत्यक्ष शिरकाव करतो आणि श्रीप्रभुंच्या लीला वाचताना, त्यांची करुणामयता, परोपकारी वृत्ती आणि भक्तवत्सलता अनुभवताना आपसूकच कंठ दाटून येतो. असो, श्रीप्रभुच्या आनंदलहरी अनुभवत आजचे पारायण पूर्ण केले. श्रीप्रभु दर्शनासाठी मंदिरात आलो. श्रीप्रभु आज अत्यंत शोभिवंत दिसत होता. गडद लाल रंगाच्या समाधीवरील वस्त्रावर, सोनेरी नक्षीकाम असलेली शेंदरी रंगाची रेशमी शाल अत्यंत मोहक दिसत होती. नवरत्नांची, सोन्याच्या, रुद्राक्षांच्या, मोत्यांच्या अनेकविध माळा घालून हा नटनागर आज नटला होता. कागडा आणि अबोलीच्या सुंदर माळा गळाभर रुळत होत्या. नागकेशर, गुलाब, शेवंती आणि फुग्यांच्या फुलांची नेत्रदीपक सजावट, श्रीप्रभभुसौंदर्यात आणखीनच भर घालत होती. श्रीप्रभु समाधीवरील चांदीचे छत्र अबोलीच्या माळांमुळे अत्यंत आकर्षक दिसत होतं. कदाचित माझ्या अंतरंगातील भावनांचे प्रतिबिंबच श्रीप्रभुच्या समाधीवर उमटले होते. श्रीप्रभु मंदिराला प्रदक्षिणा घालून यात्री निवासावर आलो. पाद्यपूजेचे सामान ठेवून श्रीजींच्या घरी आलो.

श्रीजी आपल्या नित्यपूजेत रमले होते. पाद्यपूजेचे सामान एका कोपर्‍यात लावून प्रसन्न चित्ताने श्रीप्रभुच्या तसवीरीकडे एक टक पाहत राहिलो. आज मी सकलमत संप्रदायी होणार होतो. कोरोना काळात श्रीचिद्घन प्रभुंनी मला पुस्तकांचा एक संच पाठवला होता त्यात, साधना प्रदीप नावाचं श्रीसद्गुरू माणिकप्रभु महाराज यांच्या सकलमत संप्रदायाची उपासना पद्धती असलेले हे अगदी छोटेखानी पुस्तक होते. अगदी सोळा पानांचं… गुरुउपदेश घेणाऱ्यांसाठी हे पुस्तक विनामूल्य दिले जाते किंवा इतर जनांसाठी हे केवळ वीस रुपयांत उपलब्ध आहे. कितीतरी वेळा हे पुस्तक वाचून झाले असेल. प्रत्येक वेळेस वाचताना सकलमत संप्रदायाचीची दीक्षा घ्यावी असे मनोमन वाटायचे. मृत्युनंतर मला मोक्ष वगैरे मिळेल की नाही हे माहीत नाही पण, सदेह जीवनमुक्तीचा अनुभव सकलमत संप्रदाय आपल्याला सहज करून देतो.  सर्व रूपांमध्ये श्रीप्रभुला पाहावे, कोणाची निंदा करू नये, सर्वांचा आदर करावा, असेअगदी सहज सोपे आचरण ह्या संप्रदायात आहे. कुठल्याही धर्माचे, कुठल्याही जातीचे, स्त्री-पुरुष ह्या संप्रदायाची दीक्षा घेऊ शकतात. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक या त्रिविध तापासून सुटका होऊन, आपला उद्धार व्हावा, अशी तीव्र इच्छा ज्यास आहे, तोच हा संप्रदाय दीक्षेचा अधिकारी होय. सकलमताचार्य श्रीमाणिक प्रभुमहाराजांच्या कृपेनेच माझा उद्धार होईल, अशी संपूर्ण श्रद्धा आणि भक्ती असणाऱ्यांना या मार्गाचा अवलंब सहज शक्य आहे. माझ्या वैयक्तिक जीवनातील गेल्या दोन वर्षातील घडामोडी लक्षात घेता, ही सर्व त्या प्रभुचीच इच्छा आहे, ह्याची मला मनोमन खात्री पटत होती. आज माझ्याबरोबर आणखी एकजण सकलमत संप्रदाय दीक्षा घेणार होता. पूजा करून श्रीजी गादीवर बसले. श्री भक्तकार्य कल्पद्रुमचा जयजयकार झाला. श्रीजींचे पाद्यपूजन यथासांग पार पडले. आरती नैवेद्य झाला.  दि.२३.०३.२०२२ रोजी सकाळी ११ वाजून ५३ मिनिटांनी श्रीजींनी मला मंत्रोपदेश दिला आणि मी सकलमत संप्रदायी झालो. श्रीजींनी आपल्या गळ्यातला पुष्पहार, माझ्या गळ्यात जेव्हा घातला, त्यावेळी कृतार्थतेच्या परमोच्च शिखरावर मी उभा होतो. मनी अष्टभाव दाटून आले होते. त्यावेळेस झालेली मनाची भावविभोर अवस्था शब्दांत वर्णन करणे कदाचित अशक्य आहे. पाद्यपूजेच्या वेळी श्री. राजन  मोहिलेकाकांचं  आणि श्री. चौबळ काकांचं खूप सहकार्य लाभले. त्यांच्याही प्रती कृतज्ञता अर्पण करतो.

ताक पिऊन श्रीजींच्या प्रवचनासाठी श्रीनृसिंह निलय मध्ये येऊन बसलो. पिशवितल्या निशिगंधाच्या हाराचा वास हॉलमध्ये दरवळून राहिला होता. आज प्रवचनासाठी ११ ते १४ असे चार श्लोक होते. सुरुवातीलाच गीता वंदना च्या संस्कृत श्लोक याचा भावानुवाद श्रीजींनी समजावून सांगितला. एखादं कार्य किंबहुना सर्व कार्ये जर श्रीप्रभुला साक्षी ठेवून केली तर जीवनातली सर्व कर्मे ही यज्ञकर्मे होऊ शकतात. कोणतेही कार्य करण्याआधी ते कार्य आपण श्रीप्रभुस अर्पण करू शकतो काय? असे स्वतःलाच विचारून पहावे. कालच्या प्रवचनात पंचायज्ञापैकी राहिलेल्या ब्रह्मयज्ञाचे स्वरूपही श्रीजींनी समजावून सांगितले. आजच्या श्लोकांमध्ये आलेले यज्ञ आणि तपाचे विवरण आपल्या अत्यंत रसाळ वाणीने करताना, समस्त श्रोत्यांना रुचेल, पचेल आणि ते पूर्णपणे समजेल ह्याकडे श्रीजींचा कटाक्ष होता. त्यांचे वेदांतावरील प्रभुत्व, कंठस्थ असलेले अनेक संस्कृत श्लोक, पुराणातील अनेक कथा हे पाहून श्रीजींविषयीचा आपल्या मनातील आदर अधिकच दुणावतो. आपल्या जवळ असलेले ज्ञान उधळायला श्रीजी नेहमीच तयार असतात, आणि त्या रंगात रंगून जाण्यासाठी आपल्याकडे तेवढा वेळ मात्र हवा. तेवढी सवड तरी काढायला हवी.

प्रवचनानंतर महाप्रसाद घेऊन पुन्हा यात्री निवासावर आलो. आजच्या दिवसाचे प्रवचन अर्धेअधिक ओवीबद्ध करून, दुपारचा चहा घेतल्यावर, मी यात्री निवासच्या बाजूच्या झाडीमध्ये शिरलो. जमिनीवर सागाच्या पानांचा खच पडला होता. त्यामधून चालताना पावलागणिक कर-कर असा लयबद्ध आवाज येत होता. काल मोर ज्या ठिकाणी बसले होते त्या झाडाखाली मोरपीस मिळते का? हा माझा प्रयत्न होता. सागाच्या झाडीतून पुढे पेरूच्या बनातून विरजेच्या काठाकाठाने चालत चालत संगमा पर्यंत जाऊन आलो. मोरांची एक दोन पिसे मिळाली. आजही ती आठवण जपून ठेवली आहे. वाटेत अनेक रंगाचे वेगवेगळे पक्षी पहायला मिळाले. नदीकाठी साप पशुपक्षी आणि झाडे ह्यांचं एक स्वतःचे विश्व आहे आणि प्रत्येक जण बिनधास्तपणे त्या विश्वात रममाण आहे. भटकंती करून पुन्हा खोलीवर आलो. सर्व जाणांना पाद्यपूजेचे तिर्थ वाटले. निशिगंधाचा सुगंध आज संपूर्ण यात्री निवासात दरवळत होता.

सायंकाळी भक्तकार्यासाठी पुन्हा श्रीजींच्या घरी आलो. त्यानंतर कोल पाहण्यासाठी श्रीप्रभु मंदिराच्या पटांगणात आलो. अमावास्येनंतर चंद्र जसा कलेकलेने वाढतो, तसा हा खेळ दिवसागणिक रंगतदार होत होता. गावातले बाळगोपाळ, स्त्री-पुरुष विविधरंगी पोषाख घालून हा खेळ खेळत होते. आताशा दोन वर्तुळामध्ये ही बाल गोपाल क्रीडा खेळली जाऊ लागली. सायंकाळी, दिवेलागणीला, प्रकाश झोतात, वाद्यांच्या गजरात श्रीप्रभुंच्या पदांवर, त्याच्याच समाधीसमोर, फेर धरून खेळणे हे कोल खेळणाऱ्या समस्त जनांचे अहो भाग्यच… द्वापार युगातील हे कदाचित कृष्णाचे सवंगडीच असावेत…

रात्रीचा महाप्रसाद घेऊन पुन्हा श्रीप्रभु समाधीसमोर येऊन उभा राहिलो. श्रीप्रभु समाधीवर वाहिलेल्या फुलांबाबत एक विशेष गोष्ट मला नेहमी जाणवते ती म्हणजे श्रीप्रभु समाधीवरील फुले संध्याकाळीही तितकी ताजी असतात. वास्तविक पाहता, श्रीप्रभु समाधीवर एक विद्युत प्रकाशाचा एक झोत सतत चालू असतो, त्याच्या उष्णतेने खरेतर ती फुलं मलूल व्हायला हवीत, पण तसे काही होत नाही. कदाचित ती फुलेही श्रीप्रभुच्या सानिध्यात त्याच्या चैतन्याचा अनुभव करत असावीत. आज बुधवार… आज विठ्ठलाचे भजन… आजचा रंग फिकट निळा होता. श्रीप्रभु समाधीसमोर आनंदमंटपात घातलेली फिकट निळ्या रंगाची गादी मनमोहक दिसत होती. आजही गावातली मुलं श्रीजींच्या प्रवचनाआधी भजनात दंग झाली होती. अगदी वेळेवर, साडेआठच्या सुमारास श्रीजी श्रीप्रभु मंदिरात आले आणि श्रीप्रभु दर्शन घेऊन गादीवर स्थानापन्न झाले. आज प्रवचनासाठी आता मी सखे कैसे काय करू, कधी भेटेल मम सद्गुरु… हे प्रभु पद होते. कोण मी कैचा ,काही कळेना हे कडवं समजावताना स्वस्वरूपाची खरी ओळख श्रीजींनी आपल्या नेहमीच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या शैलीत उपस्थितांना सांगितली. आजचे प्रवचनही जवळपास तासभर चालले. श्रीजींचे प्रवचन इतके सहजपणे स्फुरलेले असते की प्रवचनाच्या सुमारे अर्धा तास आधी ते विचारतात की आज कुठले पद आहे? ह्यावरून त्यांच्या ज्ञानस्वरूपाची यथार्थ ओळख पटते.

प्रवचनानंतर आजही गणराज पायी मन जड जड जड…‌ ह्या गणपतीच्या पदावर सुर आणि वाद्यांची जुगलबंदी अनुभवायला मिळाली. शास्त्रीय संगीत आपण जसजसं आपल्या आत उतरवतो, तशी तशी त्याची गोडी अधिक वाढत जाते. श्रीप्रभुच्या पदांना अनेक तालांवर ऐकणे हीसुद्धा एक पर्वणीच आहे. आजही भजनानंतर आरती झाली. आरतीनंतर शेजेचे पद झाले. कुरमुरे-खोबऱ्याचा प्रसाद सर्वांना वाटला गेला. रात्री भजनवाल्यांना श्रीजींनी आशीर्वाद दिला. श्रीजींची स्वारी घराकडे परतत असताना कमलावदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा चे दिव्य सुर आसमंतात पुन्हा भरून राहिले. आज सर्वांना आईस्क्रीम दिले गेले. भजनामुळे झालेल्या मनाची आणि आईस्क्रीममुळे झालेल्या शरीराची शीतलता अनुभवत पाय हळूहळू यात्री निवासच्या दिशेने पडत होते…

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग चौथा

तुम्ही रोज किती तास झोपता ह्यापेक्षा, तुम्ही मनाच्या कोणत्या स्थितीत झोप घेता, हे फार महत्त्वाचे आहे. श्रीमाणिक नगरच्या वास्तव्यात ही गोष्ट मला प्रकर्षाने जाणवते. काल रात्री झोपताना रात्रीचा जवळ जवळ सव्वा वाजला‌ आणि आज सकाळी जेव्हा साडेपाचला जाग आली तेव्हाही मन आणि शरीर प्रसन्नतेचा अनुभव करत होतं. प्रपंचाचं गाठोड जेव्हा तुम्ही श्रीमाणिकनगरच्या कामानी बाहेर ठेवता आणि इथल्या वातावरणात जेव्हा पूर्णपणे रंगून जाता, समरस होता, तेव्हा श्रीप्रभुच्या चैतन्याची अनुभूती आपल्याला नित्य घेता येते. मनाच्या आणि शरीराच्या ताजेपणाची कदाचित हिच गुरुकिल्ली आहे. आज चहा घेऊन यात्री निवासच्या छतावर गेलो. आज मळभ दाटलं होतं. आसपास कुठेतरी पाऊस पडला असावा. ढगांच्या आवरणातून मधूनच सूर्याची सोनेरी किरणे डोकावत होती. फिक्कट राखाडी रंगाच्या ढगांना सोनेरी-शेंदरी रंगाची कडा अतिशय सुंदर दिसत होती. बाजूच्या निलगिरीच्या झाडांवर दोन मोर बसले होते. आस्तिक जनांची उपासना चालू होती. हे सगळं भक्तिमय वातावरण मनास प्रसन्न करत होतं. गरमागरम उपमा चटणीचा नाश्ता करून श्रीप्रभुमंदिराची वाट धरली. वाटेवर अनेक प्रभुभक्त आपापल्या गप्पांमध्ये रंगले होते. ह्या गप्पांचे विषय वेगवेगळे होते. पाठीमागून चालता-चालता फक्त कान उघडे ठेवून ते ऐकणे हाही एक मोठा गमतीचा विषय होता.

श्रीप्रभु मंदिरात पोहोचून दयाघनाचे मनोभावे दर्शन घेतले आणि श्रीप्रभुला साक्षी ठेवून पारायण सुरु केले. साडेदहाच्या सुमारास तिसऱ्या दिवसाचे वाचन संपवून श्रीजींच्या घरची पूजा पाहण्यास गेलो. श्रीजीं पूजा चालू होती. श्रीजींची तासभर चालणारी ही पूजा पाहणे, हाही एक अत्यंत सुखद अनुभव आहे. गणपती, शंकराची पिंडी आणि श्रीलक्ष्मीयंत्रावरील अभिषेक, देवांना चंदन लेपन आणि श्रीयंत्रावर कुंकुमार्चन शास्त्रोक्त पद्धतीने होत राहते. ऋतू कालानुसार उपलब्ध वेगवेगळ्या, आकर्षक फुलांची आरास श्रीजी स्वहस्ते देवांना करतात, ती आरासही अत्यंत देखणी असते. पूजेनंतर आरती होऊन तीर्थ घेतले. माझ्या पाद्यपूजेसाठी केलेल्या विनंतीवरून “उद्या पाद्यपूजा करूयात”, असे श्रीजी म्हणाले आणि मन आनंदाच्या हिंदोळ्यावर झोके घेत राहिले. पूजेनंतर अवघ्या पंधरा मिनिटांत श्रीजी प्रवचन देण्यासाठी हजर होते. आजही मसाला ताक घेऊन प्रवचनाला श्रीनृसिंह निलयात हजर झालो. बाहेरची गर्मी शमविण्यासाठी उतारा म्हणून ताक, वातानुकूलित सभागृह होते पण, अंतरातील आध्यात्मिक तापाच्या शमनासाठी श्रीजींचे प्रवचन होते. गर्मीतही शरीर आणि मन अंतर्बाह्य शीतलतेचा अनुभव करत होतं. आज सात ते दहा ह्या चार श्लोकांवर श्रीजींचे विस्तृत विवेचन झाले. आज मुख्यत्वेकरून आहारासंबंधित गोष्टींवर भर होता. सात्विक, राजसिक आणि तामसिक लोकांचा असलेला आहार, आपले मन हे अन्नाच्या सुक्ष्म अंशाने बनलंय आणि अन्नाच्या तेजोमय अंशाने वाणी बनते, प्रत्येकाने करावयाचे पंचयज्ञ (ब्रह्मयज्ञ, देवयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ, मनुष्ययज्ञ)…‌ प्राण्यांचा बळी ही हत्या गणली जाते, पण वनस्पतींच्या बाबतीत तसे नाही. कारण, वनस्पतीत जीव आहे पण अंतःकरण नाही त्यामुळे वनस्पती पीडेचा अनुभव करू शकत नाही… श्रीमद्भगवद्गीतेच्या धडाडणाऱ्या ह्या यज्ञामध्ये श्रीजींच्या विद्वत्ताप्रचुर संबोधनाच्या आहुत्या एकापाठोपाठ एक पडत होत्या आणि संपूर्ण समाधानाने मन सात्विकतेचा अनुभव करत होतं.

महाप्रसाद घेऊन यात्री निवासात आलो. आजची दुपार निवांत होती. संध्याकाळी कोल आणि प्रवचन-भजनाचा कार्यक्रम होता. आजच्या प्रवचनालाही ओवीबद्ध करण्याचा प्रयत्न केला. थोडीशी वामकुक्षी घ्यावी म्हटले तर चहासाठी वर्दी आली. आजच्या दुपारच्या चहाला गप्पांचा फड छान रंगला होता. श्रीमाणिकनगरच्या आसपासची स्थाने आणि प्रत्येकाने त्या स्थानासंबंधीचे अनुभव कथन केले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास उद्याच्या पाद्यपूजेसाठी प्रसाद आणि फुले आणण्यासाठी हुमणाबादला गेलो. येथे कर्नाटकची एसटी सुरळीत चालू होती. बाजारपेठेत फळांची रेलचेल भरपूर होती. येथे चिंचेसमवेत चिंचोकेही विकावयास होते. लहानपणी हे चिंचोके चुलीत भाजून, खिशात भरून जायचे दिवस आठवले. सध्याच्या आधुनिकतेमध्ये लहानपणीचा हा रानमेवा दुर्मिळ होत चाललाय. फळफुलादि गरजेच्या वस्तू घेऊन येताना, चालत यात्री निवासावर आलो. येताना विरजानदीच्या (ओढ्यावजा) पुलावर थांबलो. अनेक बगळे किडे टिपण्यात व्यस्त होते. दगड धोंड्यातून खळखळणारी विरजा छान संगीत ऐकवत होती. तिच्या सानिध्यात काही क्षण व्यतीत करून यात्री निवासावर आलो.

स्नान करून श्रीप्रभुमंदिरात सायंकाळी सव्वासहाला मुक्तीमंटपाजवळील औदुंबराखाली येवून बसलो. वेदांत सप्ताहात जमलेल्या भक्तांच्या मांदियाळीमुळे आनंदलेला श्रीप्रभु, आकाशात जांभळ्या गुलाबी रंगाच्या मुक्त उधळणीने आपला आनंद व्यक्त करत होता. श्रीजींच्या घरी भक्तकार्यास उपस्थित राहून कोल पाहायला श्रीप्रभुमंदिरासमोरील पटांगणात बकुळीच्या झाडाखाली बसलो. आज कोल खूपच छान रंगला होता. श्रीजींच्या परिवारासहित श्रीमाणिकनगरातील बहुतेक लोक हा कोल खेळायला उपस्थित असतात. वरवर जरी हा खेळ सोपा दिसला, तरी यात एक प्रकारची लयबद्धता आहे. पाच चरणांमध्ये खेळली जाणारी बालगोपाल क्रीडा शिकण्यासाठी अभ्यास आणि सराव अत्यंत गरजेचा आहे. श्री. सुभाष खडकेसरांनी माणिक नगरच्या जवळपास दोन पिढ्यांना हा खेळ शिकवला आहे. कोलच्या वेळी श्रीसंस्थानाचे गोंधळी श्री. राजा गरूडकर हे संबळ वाजवतात. मुंबईच्या श्री. प्रकाश साळसकर यांनी ढोलकीच्या तालावर कोलमध्ये स़ंपूर्ण सप्ताहात छान रंगत आणली होती. श्री संस्थानातील पुरोहित, सेवक वर्ग आणि ग्रामस्थ श्रीप्रभुपदांचे गायन करतात आणि वाद्यांच्या तालावर बाल गोपाल फेर धरून क्रीडा करतात. हा सोहळा फार मनोहर असतो. श्रीप्रभु कोणत्या ना कोणत्या रूपात ह्या बालक्रीडेत सहभागी होत असणार, ह्यात तीळमात्रही शंका नाही.‌

संध्याकाळचा महाप्रसाद घेऊन श्रीप्रभुमंदिरात भजनासाठी येऊन बसलो. आजचा रंग लाल होता. देवीलाही कुंकवाचा लाल रंग अती प्रिय आहे. मंगळवारचे भजन, हे देवी भजन आहे. श्रीजींच्या आगमनाआधी गावकऱ्यांचे भजन नित्यक्रम होता. आजची तरुण पिढी भजनामध्ये दंग होत असलेलं हे चित्र खूपच आश्वासक आहे. श्रीजींच्या पारंपरिक आगमनानंतर आज प्रवचनासाठी लाग लाग सख्या गुरु पायी.. हे श्रीमाणिक प्रभुंचच पद होते. आजचे निरूपणही सुमारे तासभर चालले. श्रीजींना सततच्या ऐकण्याच्या सवयीमुळे अध्यात्मातील संकल्पना हळूहळू समजायला लागल्यात. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सुसंगत उत्तरे अंतरातून यायला सुरुवात झाली आहे. मनाचीआणि बुद्धीची एकवाक्यता होत होती. श्रीजींच्या प्रवचनानंतर, गणराज पायी मन जड जड जड… हे श्रीमाणिकप्रभु विरचित पद ऐकणे म्हणजे कानांसाठी एक अद्भूत पर्वणीच होती. श्रीआनंदराज प्रभुंसमवेत सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक, श्री. जयंत कैजकर, श्री. सौरभ नाईक, तबला वादक श्री. सौरभ क्षीरसागर आणि श्री. राजू सिंग, सनई वादक श्री. प्रशांत जाधव, ढोलकीवर श्री. प्रकाश साळसकर, पेटीवर श्री अजयजी सुगावकर, तंबोरा वादक श्री. दिनेश कुलकर्णी ह्यांच्या सुरसाजांची जुगलबंदी अनुभवणे, हा स्वर्गीय अनुभव होता. हे एकच पद जवळ जवळ पंचवीस मिनिटे चालले. पुढच्या दिवसांतही ह्या जुगलबंदीने मनास मोहून टाकले. श्रीमाणिकनगरास संगिताचे माहेरघरही म्हणतात. लतादीदी, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज सारख्या अनेक दिग्गजांनी आपली सेवा श्रीप्रभुसमोर रुजू केली आहे. भजनानंतर आरती झाली आणि शेजेचे पद म्हणून भजन सेवा पूर्ण झाली. आज कुंकूवाचा टिळा सर्वांना लावला गेला. खोबरे कुरमुऱ्याचा प्रसाद सर्वांना वाटला गेला. रात्री भजनाच्या मंडळींना श्रीजींनी आशीर्वाद दिला. श्रीजी परताना कमलावदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा… ह्या पदाच्या चैतन्यलहरी आसमंतात गुंजून राहिल्या. आज भजनानंतर रात्री, चिवडा, द्राक्षे आणि गुलाबजाम सर्वांना वाटली गेली. भजनानंतर कानाच्या तृप्तीनंतर ह्या फराळाने पोटही तृप्त झाले. मनाची आणि शरीराची संपूर्ण तृप्ती श्रीमाणिकनगरात अखंड होत असते.. आणि ह्या तृप्तीचा अनुभव प्रत्यक्ष घेण्यासाठी एकदा तरी श्रीमाणिकनगरी जायला हवे. नव्हे, नव्हे जायलाच हवे…

क्रमशः…

वेदांत सप्ताह भाग तिसरा

आज (२१.०३.२०२२) पहाटे पाचलाच जाग आली. मोरांचा दूरवरून येणारा केकारव गाढ झोपेतून जागा करायला पुरेसा असतो. श्रीमाणिकनगरच्या वातावरणात एक प्रकारची प्रसन्नता आहे. कालच्या दिवसभराच्या भरगच्च कार्यक्रमानंतर रात्रीच्या केवळ पाच तासाच्या झोपेनंतर ही मन चैतन्याची अनुभूती करत होतं. झटकन उठून बसलो आणि श्रीजींचं कालचं वेदांतावरचं प्रवचन ओवीबद्ध करावसं वाटलं. श्रीसंस्थानाने दिलेल्या वही पेनाचा चांगला उपयोग झाला. वहीतल्या नोंदी आणि श्रीजींचे हृदयात कोरलेले शब्द त्याची सांगड घालून संपूर्ण प्रवचन ओवीबद्ध करायला सुरुवात केली. सहाच्या ठोक्याला चहा आला. दोनच दिवसात सकाळचा आणि दुपारचा चहा घेताना भक्तांचा छान कट्टा जमू लागला. एव्हाना बहुतेक सर्वांची ओळख झाली होती आणि त्यातून निरनिराळ्या विषयांवर चर्चा होत होत्या. श्रीमाणिकप्रभुंनी स्थापन केलेल्या, सकलमत संप्रदायात सर्व मतांचा, सर्व धर्मांचा आदर होतो. येथे कोणाची निंदा नसते. एरवी तावातावाने आपला मुद्दा रेटायचा ही खुमखुमी येथे आपोआप शांत झाली होती. समोरच्याचं म्हणणं शांतपणे ऐकत राहिलं, त्यावर काही प्रतिक्रिया दिली नाही की मन आपोआप शांत होतं. सर्वांतरी श्रीमाणिक ही भावना अंतरात रुजू लागली की इतरांबद्दलचा आदर मनात दुणावू लागतो. श्रीमाणिकनगरातील वास्तव्यात माझ्या अंतरातील हा बदल मला प्रकर्षाने जाणवतो. तोच धागा पकडून सकलमताची ही सुंदर विचारधारा जीवनात अंगीकारण्याचा प्रामाणिक प्रयत्न निरंतर सुरू आहे. चहानंतर आज शेजारच्या खोलीत डोकावले. ज्येष्ठांचा योगा चालू होता आणि त्याबरोबर हास्यांचे फवारे उडत होते. शाब्दिक कोट्यांचा इतका परिणामकारक वापर योगाच्या दरम्यान मी प्रथमच अनुभवत होतो. एकंदरीतच आज हास्ययोगा ही अभिनव संकल्पना पहायला मिळाली. वयोमानानुसार शरीराच्या मर्यादित हालचालींचा बाऊ न करता, त्याला खेळीमेळीने घेणे हा ही, जीवनाकडे सकारात्मकतेने पाहण्याचा दृष्टिकोन ज्येष्ठांकडून शिकता आला. स्नानादी कर्मे उरकून राहिलेल्या ओव्या पूर्ण केल्या. नाश्ता करून दुसऱ्या दिवसाच्या पारायणासाठी औदुंबर वृक्षाखाली आलो. आज प्रत्येक जण आपापल्या सवडीनुसार वाचनास येऊन बसला होता. सहजच लक्षात आले की जो काल ज्या जागेवर बसला होता, आजही तो त्याच जागेवर पारायणास बसला होता. कुठेही गडबड गोंधळ नाही, धक्काबुक्की नाही, हमरीतुमरी नाही. मनोभावे आपापलं वाचन करावं आणि श्रीप्रभुला ते सप्रेमे अर्पण करावं. श्रीप्रभुचरितामृत पारायण सप्ताहात रोज ९ अध्याय वाचायला येतात. काळंभटास विश्वंभर दर्शन, भाव्या आणि माणक्याच्या रूपात श्रीमाणिकप्रभुंचे प्रकटणे ह्या कथा वाचताना श्रीप्रभुचे अस्तित्व आपल्याभोवती जाणवते.

आज श्रीमार्तंड माणिकप्रभुंची पुण्यतिथी होती. त्यानिमित्त श्रीजींची नित्यपूजा आज मुक्तीमंटपातील श्रीमार्तंड माणिकप्रभुंच्या समाधीवरच रूद्राभिषेकयुक्त महापूजेने संपन्न झाली. श्रीमार्तंड प्रभुंचा अवतार हा शिवाच्या मल्हारी म्हाळसाकांतरुपाचा अवतार मानला जातो. सोनेरी काठाच्या गर्द जांभळ्या रेशमी शालीमध्ये, दागिन्यांच्या मोहक समाजात, श्रीमार्तंड माणिकप्रभुंचे रुप मनोहर भासत होते. आपला नश्वर देह जरी लौकिक रुपाने विसर्जीत केला तरी, आपल्या वेदांतील अद्वितीय, अविस्मरणीय पदांनी समस्त जनांच्या हृदयात अजरामर झालेल्या ह्या महात्म्याप्रती कृतज्ञता व्यक्त करुन, त्यांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन प्रवचनाच्या आतुरतेने निघालो. ताक पिऊन श्रीनृसिंहनिलयमध्ये प्रवचनासाठी जाऊन बसलो.

सव्वाबाराच्या सुमारास श्रीभक्तकार्य कल्पद्रुमच्या गजरात श्रीजींचे दिमाखात आगमन झाले. गुरुपरंपरेस वंदन करून, श्री भगवद्गीतेचे स्मरण करून श्रीजींनी कालच्या दिवसाच्या निरुपणाचे सिंहावलोकन केले. श्रीजींची ही एक आगळी वेगळी शैली आहे. काल ऐकलेले पण मानवाच्या सहज स्वभावानुसार कदाचित विस्मृतीत गेलेले ज्ञान ह्या सिंहावलोकानाने श्रोत्यांना पुन्हा आठवते आणि पुढच्या विवेचनात एकसंधता येते. मागच्या सर्व वेदांत प्रवचनाचे जर व्हिडिओ पाहिले तर ही गोष्ट आपल्याला सहज लक्षात येते. YouTube वर Manik Prabhu या संकेत स्थळावर आपल्याला गीतेच्या निरुपणाचे आधीचे व्हिडिओ पाहता येतात. श्रीजींनी आज तीन ते सहा अशा चार श्लोकांवर विस्तृत भाष्य केले. आपल्या विचारांचा आपल्या भविष्यातील व्यक्तिमत्वावर, नियतीवर कसा परिणाम होतो हे लाओ त्झुच्या Watch your thoughts, they become your words… ह्या सुविचाराने छानपणे समजावले. विश्वास आणि श्रद्धा यातील भेद, श्रद्धेचे मानवी जीवनात डोकावणारे प्रतिबिंब, आपल्या श्रद्धेला घरात असलेले वातावरण, अनुवंशिकता, पूर्वजन्मातले संस्करण हे कसे कारणीभूत होतात, हे समजावताना श्रीजींनी अनेक विविध उदाहरणे दिली. देवांचे, यक्षांचे पूजन अथवा भूत प्रेतांचे आवाहन व त्यावरून एखाद्याच्या श्रद्धेची करता येणारी पडताळणी, सात्विक राजसिक आणि तामसिक देवतेच्या उपासनेचे फळ, दंभ आणि अहंकार ह्यातील भेद समजावताना श्रीजींची वेदांत विषय समजावून सांगण्याची तळमळच अधोरेखित होते. परमात्मा आपल्याच शरीरात असून, राजसिक आणि तामसिक लोक आपल्याच शरीराला पीडा पोहोचवून, आतील परमात्म्यासच कशी पीडा पोहोचवतात, ह्या टप्प्यावर आजच्या दुसऱ्या दिवसाच्या निरूपणाची सांगता झाली. महाप्रसाद घेऊन पुन्हा तीनच्या सुमारास यात्री निवासात आलो. आज दुपारीच आजचे प्रवचन ओवीबद्ध करून पूर्ण केले.

मुक्तीमंटपात श्री मार्तंड माणिकप्रभू पुण्यतिथीनिमित्त आज आराधना होती. सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीमार्तंड माणिकप्रभूंच्या आराधनेस उपस्थित राहीलो. आजही श्रीजींचा संपूर्ण परिवार आराधनेला उपस्थित होता. कालच्या सारखेच ब्राह्मण भोजन, दक्षिणा, भजन पार पडल्यावर भाविकांना तीर्थ प्रसादाचे वाटप झाले. एव्हाना सात वाजले होते. श्रीप्रभु मंदिराच्या प्रांगणात आजही कोल खेळला गेला. दिवसागणिक बालगोपाळांची गर्दी वाढत होती. मध्यभागी गायक आणि वाद्यवृंद होता आणि त्यांच्या सभोवती बाळगोपाळांचा रासक्रीडेचा खेळ छान रंगला. सुरुवातीस संथ गतीने खेळला जाणारा कोल शेवटच्या टप्प्याला अगदी जलद गतीने, लयबद्ध रीतीने खेळला जातो. मला जरी कोल खेळता येत नसला तरी त्या तालावर मन आणि पाय दोन्ही थिरकत होते.

रात्रीच्या महाप्रसादानंतर श्रीप्रभु मंदिरात आलो. आज, सोमवारी, कर्पूरगौर श्रीप्रभु नागकेसरांच्या फुलांच्या सजावटीत मोहक दिसत होता. श्रीजींच्या प्रवचनाला अजून थोडा वेळ होता. आजही गावातील तरुण मंडळी भजन सेवा प्रभू चरणी अर्पण करीत होती. साडेआठच्या सुमारास वाजत गाजत दिमाखात श्रीजींची स्वारी श्री प्रभु मंदिरात आली. आज पांढऱ्या रंगाची गादी होती. वेदांत सप्ताहात सात वारांचे सात रंग असतात. त्या त्या दिवसाचा गादीचा आणि श्रीजींच्या कपड्यांचाही रंग एक चअसतो. कालच्या मल्हारीच्या भंडारस्वरूप पिवळ्या रंगानंतर, आज, सोमवारी कैलासाधिपती कर्पुरगौर शिवाचा, पांढरा रंग होता. गादीवर बसण्याआधी श्रीजींची श्रीप्रभुशी नजरानजर झाली.‌ त्यावेळची श्रीजींची उभी असलेली मनमोहक मूर्ती आजही मनावर गारूड करून आहे. आज सोमवारी प्रवचनासाठी शंकराच्या भजनातले गुरुभक्तीपर ब्यागने गुरुविगे शरण नी होगो हे कन्नड पद होते. मला हे पद जरी पाठ असले तरी नीटसा अर्थबोध होत नव्हता. ब्यागने म्हणजे शीघ्र… तु शीघ्रातिशीघ्र गुरूला शरण जा, आपल्या हृदयकमळावर श्रीगुरुचरणांना स्थापित करून त्याचे गुणगान कर. हे माणिक, तू श्रीगुरूला शरण जाऊन स्वतःच ब्रह्म बन… अर्थात् आपल्या आत्मस्वरूपाला ओळख… श्रीमाणिक प्रभुंची काव्यप्रतिभा विलक्षण होती. आजही दोन कडव्यांच्या ह्या पदावर जवळपास तासभर विवेचन झाले. असं वाटायचं हे विवेचन कधी संपूच नये. वरवर सहज वाटणाऱ्या या पदाचा गूढार्थ जेव्हा श्रीजींनी विशद केला तेव्हा डोळ्यांच्या कडा अलगद पाणावल्‍या होत्या. सोमवारच्या शंकराच्या भजनाला रात्र जशी पुढे सरकत होती तसा अधिकच रंग चढत होता. श्रीआनंदराज प्रभुंचा दैवी स्वर, त्याला लाभलेली श्री. अजयजी सुगावकरांच्या पेटीची आणि श्री. राजू सिंग यांच्या तबल्याची साथ उपस्थितांच्या मनास सुखावत होती.‌ झांजाचा लयबद्ध आणि टिपेला पोहोचणारा कल्लोळ मनास झिंग आणत होता. शेवटच्या पदाआधी श्रीप्रभुमंदिरासमोर आरती झाली. आरतीनंतर पुन्हा शेजारतीचे पद गादीपाशी येऊन म्हटले गेले. सर्वांच्या कपाळी भस्म लावून खोबरे कुरमुऱ्याचा प्रसाद वाटला गेला. आजही रात्री भजनासाठीच्या मंडळाच्या प्रमुखाला शाल देऊन आशीर्वाद देण्यात आला. भजनानंतर कमलवदनी हे अमृत भरा, माणिक माणिक मंत्र स्मरा पद उच्चारवात आनंदमंटपात सर्वांमुखी गुंजू लागले. ह्या पदाच्या गजरात श्रीजी आपल्या निवासस्थानी परतू लागतात. आजही घड्याळाचा काटा मध्यरात्र उलटून गेल्याचे दाखवत होता. अखंड वीणा श्रीमाणिकनाम झंकारत होती आणि भोळासांब श्रीप्रभु गाभाऱ्यातून घरी परतणाऱ्या भक्तांकडे कृपादृष्टीने पाहत होता…

क्रमशः…