धरता येते पण सोडता येत नाही

मी प्रभुसंप्रदायात अगदीच नवीन होतो. मी फक्त श्री रत्नाकर चौबळ यांना ओळखत होतो. परमपूज्य सिद्धराज महाराजांशी माझी जास्त बोलण्याची हिम्मत सुद्धा व्हायची नाही. श्री ज्ञानराज महाराजांशी बऱ्याच वेळी संवाद होत असे. आमच्या अडीअडचणी आम्ही चौबळ काकांच्या थ्रू श्रीजींकडे सांगत होतो. ९ सप्टेंबर २००४ ला चौबळ परिवार दुबईला होता. मी कोल्हापूरला ७ सप्टेंबर ला गेलो आणि ९ तारखेला परत मुंबईला आलो. प्रवास जरा हेक्टिक झाल्यामुळे घरी येऊन झोपलो. तेव्हड्यात फॅक्टरी मधून फोन आला आणि बातमी ऐकून माझे धाबं दणाणलं. फॅक्टरी मध्ये चोरी झाली होति ७/८ लाखाच  स्टील चोरीला गेलं. मी घरी सांगितलं ५० हजाराच नुकसान झालं असं खोटं सांगितलं. घरचे सगळे शॉक घेतील असे वाटले. मी पोलीस कंप्लेंट केली आणि फॅक्टरी ची कंडिशन बघत होतो. नवीन बिझनेस चालू केला आणि मोठा फटका बसला. चौबळ काकांना फोन करायची सोय नव्हती की जेणेकरून ते श्रीजीना सांगतील. मी सरळ श्री ज्ञानराज महाराजांना  फोन केला आणि सर्व काही सांगितलं. त्यांनी सांगितलं ‘‘काळजी करू नको मी श्रीजीना सांगतो.’’ महाराज माझ्याशी बोलले आणि खूप धीर दिला. श्रीजींचा प्रसाद दुसऱ्या दिवशी आला. त्यांनी मला पुण्याच्या एका  मोठ्या पोलीस अधिकाऱ्याचा नंबर दिला व स्वतः पण त्यांच्याशी बोलले. मी त्या अधिकाऱ्याला माझे सर्व चोरीचे डिटेल्स दिले. दिवाळी झाल्यावर श्रीजींचा मोठा मुंबई दौरा होता. मी सर्व श्रीजींवर सोडून बिझनेस आणि दौऱ्याच्या कामाला लागलो. श्री ज्ञानराज महाराज रोज फोन करून चोरीच काय झालं म्हणून चौकशी करत होते. मी देखील पोलीस स्टेशनला जाऊन विचारत होतो. बरोबर एक महिन्यानी एके दिवशी जेवताना श्रीजींनी ज्ञानराज महाराजांकडे चौकशी केली की ‘‘त्या शिरीषच्या चोरीचं काय झालं.’’ त्यांना कळलं की अजून काही सापडलं नाही. यावर श्रीजी कांहीच न बोलता सरळ झोपायला गेले व पांघरूण घेऊन झोपले. त्याच रात्री पोलिसांनी चोरी पकडली मला सकाळी ६ वाजता पोलीस स्टेशन मधून फोन आला ‘‘तुमचा चोरीचा माल मिळाला तुम्ही या आणि घेऊन जा कोर्ट फॉर्मॅलिटी नंतर करा.’’ मी सरळ श्री ज्ञानराज महाराजांना फोन लावला त्यांना सर्व हकीकत सांगीतली. ते म्हणाले ‘‘थांब, श्रीजीशी बोल’’ असे म्हणून ते फोन घेऊन खाली श्रीजींच्या बेडरूम मध्ये गेले. त्याना पाहताच श्रीजी पांघरूण बाजूला करून स्वतः म्हणाले ‘‘शिरीषची चोरी मिळाली ना?’’ मी त्यांच्याशी बोललो अश्रू अनावर झाले होते माझे. त्यांनी फक्त एवढच सांगितलं ‘‘मी आहे घाबरू नकोस.’’ असे सद्गुरू मिळायला भाग्य लागतं. आज देखील तो प्रसंग आठवला की नकळत डोळे ओले होतात. श्री सिध्दराज महाराज काय किंवा श्री ज्ञानराजमहाराज काय त्यांना भक्तावरच अतिशय प्रेम! खऱ्या अर्थाने भक्ताच्या योगक्षेमाची अखंड काळजी घेत असतात.

श्री ज्ञानराज महाराजांनी २०१५ जानेवारी महिन्यात आम्हाला मृत्यू च्या दाढेतून बाहेर काढलं. मी, अतुल मोहिले, अनंत सकपाळ, बाळा चौबळ अशी मंडळी श्रीजींचं प्रवचन ऐकून बीदरहून परत येत होतो. मी ड्रायविंग करत होतो  रात्र झाली होती. घाटात बैलगाडी ऊस घेऊन रॉंग साईडला आली मी बैलगाडी वाचवायला गेलो आणि राईट साईडला गाडी घातली आणि समोरून येणारा भरधाव ट्रक माझी गाडीची राईट साईड चिरत गेला सगळ्यांना वाटले संपलं! आम्ही सगळे पाच मिनिट सुन्न होतो. बाहेर येऊन बघितलं, कोणीही जखमी नव्हतं, रक्ताचा एक थेंब सुद्धा नव्हता. गाडी तश्या परस्थितीत चालू होती. आम्ही माणिकनगरला आलो सर्व हकीकत महाराजांना सांगीतली. महाराज म्हणाले आता उद्या सकाळी प्रभूला अभिषेक करून जा. सकाळी अभिषेक करून श्रीजीं कडे नास्ता करून निघालो. ती चेचलेली गाडी मुंबई पर्यंत सुखरूप आली. असे प्रसंग बघितले म्हणजे प्रभूंच्या सत्तेची प्रचिती आल्यावाचुन राहत नाही त्या प्रभूला फक्त धरता येते सोडता येत नाही.