ज्ञानियांचा राजा

वेदांताच्या असीम ज्ञानराशीतील प्रमेयांचे एक एक दालन उघडत असताना, श्रीजींचा परावलीचा, धीरगंभीर आवाजातील वंदे श्री प्रभु सद्गुरुं गुणनिधीं हा श्लोक कानावर आला की, एरवी इतस्ततः अखंड भूणभूण करत असलेला मनाच्या विचारांचा भुंगा, सद्गुरु चरणावर अलगद जाऊन विसावतो. भ्रमर जसा कमळाच्या मकरंदाने देहभान विसरून, कमळामध्ये रात्रभर बंदिस्त होऊन जातो, अगदी तसेच काहीसे श्रीजींचे प्रवचन ऐकताना होते. श्रीजी आपल्याला समजावून देत असलेल्या, स्वतःच्या विद्वत्ताप्रचूर संभाषणातून आपल्यासमोर ठेवत असलेल्या अद्वैत मकरंदाची गोडी ही अशीच अविट आहे.

ह्यावेळी ठाणे दौऱ्यातील प्रवचनांमध्ये पुन्हा एकदा श्रीजींनी श्रीमद्भगवद्गीतेचे सार उपस्थितांसमोर उलगडले. ह्या आधीच्या प्रवचनांमध्ये श्रीजींनी जरी हे विषय घेतले असले तरी, साधकाला अत्यावश्यक असणारी उजळणी ह्या प्रवचनाच्या निमित्ताने झाली. सद्गुरुंच्या मुखकमलांतून होणाऱ्या ह्या दिव्य वाणीच्या अमृतवर्षावात न्हाऊन निघताना होणाऱ्या उजळणीमुळे, तो तो विषय, जीवन जगण्यासाठी गरजेचे असलेले तत्वज्ञान, आपल्या मनावर चांगले ठसते. आणि जनसामान्यांच्या नित्याच्या व्यवहारातील उदाहरणांचा धागा पकडून, ते त्यांच्यासमोर सुलभतेने मांडण्याच्या श्रीजींच्या ठाई असलेल्या हातोटीमुळे, परिणामकही होते.

जीवनात ईश्वराची आवश्यकता का आहे? ईश्वराचे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक स्वरूप, तो आपल्यातच आहे व तो कसा ओळखावा? जगावे आणि त्याचबरोबर मरावे कसे? कोणता आहार आणि कसा घ्यावा, इत्यादी प्रश्नांची उत्तरे शास्त्र आणि पुराणातील अनेक अनेक संदर्भ देऊन, श्रीजीं ह्या प्रवचन मालिकेच्या माध्यमातून जनमानसांवर सुसंस्कारच केले. मानवी जीवनाला समृद्ध करणारी, पण जनसामान्यांना माहीत नसलेली जीवन जगण्याची कलाच, जणू ह्या प्रवचन मालिकेच्या निमित्ताने श्रीजींनी समजावून सांगितली.

ही प्रवचने इतकी सरळ आणि सहज होती की, अगदी पाच-सहा वर्षाच्या मुलांनीही त्यात प्रत्येक दिवशी समरसून सहभाग घेतला आणि प्रवचनाच्या अनुषंगाने शेवटच्या दिवशी श्रीजींना प्रश्न विचारले. आणि अर्थातच श्रीजींनीही प्रसंगी बालक होऊन, त्यांचे सम्यक समाधान केले. यातच श्रीजींची प्रवचन समजावून सांगण्याची सहजता उद्धृत होते.

प्रकृती अस्वास्थ जरी असले तरी, समोर विराट जनसमुदाय असला की, श्रीजींना स्फुरण येते आणि चैतन्याचा हा अविष्कार आपल्याला त्यांच्या देहबोलीतून आणि अखंड पाझरणाऱ्या वाणीतून अनुभवता येतो. प्रवचनादरम्यान श्रीजींचे, त्या परमात्म्याशी असलेले तादात्म्य अनुभवता येते. प्रवचनानंतरही येणाऱ्या सर्व भाविकांना अत्यंत प्रसन्नतेने सामोरे जाणे, त्यांना हवा तसा अत्यंत आवश्यक असलेला, संपूर्ण आधार देणे आणि त्यातच आनंद मानणे हे सद्गुरूंच्या ठाई असलेले सद्गुणही ह्या प्रवचन मालिकेदरम्यान अनुभवता आले. अनेक सदभक्तांनी दिलेल्या दुर्मिळ प्रेमळ भेटवस्तूही सकलमत संप्रदायाचे तत्वज्ञान जनमानसांमध्ये रुजत असल्याचेच द्योतक होते.

संसाराच्या रहाटगाड्यांमध्ये अडकून पडलेल्या, विचार आणि विकारांच्या दावणीला बांधलेल्या आम्हा जनसामान्यांना सहजमुक्तीची वाट दाखविणाऱ्या, आमच्या मनावर तसे सुसंस्कार करून, आपल्या ज्ञानदानाने आमची झोळी भरभरून आम्हाला ज्ञानसंपन्न करणाऱ्या, आमच्या जीवनाची दशा बदलून त्याला सुयोग्य दिशा देणाऱ्या, ह्या ज्ञानियांच्या राजाप्रती कृतज्ञता आणि त्यांच्या परममंगल चरणी अनंत कोटी नमन!

नित्य माधुकरी सेवा

माणिकनगर येथे आपली गौरवशाली संस्कृती आणि अनेक परंपरा अत्यंत आत्मियतेने जपल्या जातात. “नित्य माधुकरी सेवा” हीसुद्धा मला अतिशय भावलेली, अशीच एक वैशिष्ट्यपूर्ण परंपरा.

वेदांमध्ये पाच प्रकारच्या यज्ञांचे वर्णन केले आहे. ब्रह्म यज्ञ, देव यज्ञ, पितृ यज्ञ, भूत यज्ञ आणि मनुष्य यज्ञ. ह्यापैकी मनुष्य यज्ञामध्ये, आपल्या घरी आलेल्या अतिथीचे आदरातिथ्य करून त्यांना भोजन देऊन संतुष्ट करावे, असे सांगितले आहे. आपणही आपल्या घरी येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करून त्यांना फराळ किंवा भोजन देऊन संतुष्ट करतो किंवा प्रवासात आपण काही खाताना सहप्रवाशांनाही देतो, हाही मनुष्ययज्ञाचाच भाग. पूर्वीच्या काळी भोजनाच्या वेळी आपल्या घराच्या आसपास कुणी भुकेला तर‌ नाही ना, ह्याची खात्री केली जायची. तसे कुणी आढळल्यास त्याला भिक्षा अथवा भोजन देऊन मगच, आपण भोजन करायची पद्धत होती. कालौघात ही परंपरा हल्ली लुप्त होत चालली आहे.

ह्या मनुष्य यज्ञाचे, अन्नदानाचे महत्व लक्षात घेऊनच श्री माणिकप्रभु संस्थानातर्फे दोन्ही वेळचा प्रभुप्रसाद येणाऱ्या सर्व भक्तांसाठी विनामुल्य उपलब्ध आहे. गेले कित्येक वर्षे ही परंपरा अव्याहतपणे सुरु आहे. माणिकनगरी झोळीची परंपरा अजूनही सुरू आहे. ह्या झोळीचा, माधुकरीचा प्रसाद आजही भंडारखान्यातील अन्नामध्ये मिळवून भक्तांना वाटला जातो. ह्या माधुकरी सेवेत आपल्याला दररोज सहभागी होता येईलच, असे नाही. माणिकनगरापासून दूर राहणाऱ्या भक्तांच्या मनात माधुकरी सेवेत आपल्याला सहभागी होता येत नसल्याची सल अनेक प्रभुभक्तांच्या मनात होती. भक्तकार्यकल्पद्रुम श्रीप्रभु भक्तांच्या अंतरीची तळमळ जाणून‌ द्रवला नाही, तर‌ नवलच! आणि म्हणूनच की काय परगावी असणाऱ्या भक्तांसाठी नित्य माधुकरी सेवेचा सुंदर पायंडा श्री सिद्धराज माणिकप्रभुंच्या गौरवशाली कार्यकाळात पडला.

ह्या सेवेंतर्गत भक्ताला एक डबा आणि ओळख क्रमांक दिला जातो. प्रत्येकाने आपला डबा आपापल्या घरी घेऊन जायचा. दररोज तसेच, काही विशिष्ट प्रसंगी (पारायण, सण, मंगलकार्य) यथाशक्ती रक्कम अन्नदानसाठी ह्या डब्यात जमा करायची. दर दिवशी अगदी पाच-दहा रुपयांपासून आपण कितीही यथाशक्ती रक्कम ह्यात जमा करु शकता. मी साधारणपणे भोजनाला बसायच्या आधी प्रभुंच्या झोळीचे स्मरण करून, तसेच जगातील कोणी भुकेले असतील त्यांना आठवून, त्यांच्या वाट्याचा भाग म्हणून अन्नदानासाठी काही रक्कम नियमित ह्या डब्यात जमा करतो. ह्या निःस्वार्थी सेवेमुळे अन्नाची गोडी आणि खाल्ल्याचे समाधान अजूनच वाढते. साधारणपणे श्रीदत्त जयंतीला भक्त नित्य माधुकरी सेवेसाठी आपली नाव नोंदणी श्री प्रभु संस्थानात करुन, आपापला डबा घेतात आणि पुढच्या श्रीदत्त जयंतीला तो डबा श्रीप्रभु संस्थानात जमा करतात. नित्य माधुकरी सेवेतून जमा झालेल्या निधीचा विनियोग प्रभुंच्या नैवेद्यासाठी आणि भंडारखान्यात सुरु असलेल्या अखंडपणे सुरू असलेल्या अन्नदानासाठी वापरला जातो. अन्नदानासाठी आपण यथाशक्ती केलेल्या दानाचा विनीयोग, श्री प्रभुपादस्पर्शाने पुनित झालेल्या श्री दत्तक्षेत्री भक्तांच्या क्षुधा शांतीसाठी होतो, ह्यात समाधान तर अपार आहेच, पण नित्य माधुकरी सेवेने आपले प्रारब्ध क्षीण होऊन आपल्या पदरी अन्नदानाचे पुण्यही सहज जमा होते. श्रीप्रभु संस्थानातर्फे नित्य माधुकरी सेवेसाठीचे हे डबे विनामुल्य उपलब्ध आहेत. मनुष्य यज्ञाचे, अन्नदानाचे पुण्यफळ सहज पदरी पाडून देणाऱ्या ह्या सत्पात्री दानाचा लाभ जास्तीत जास्त सद्भक्तांना मिळो, आणि त्यांना प्रभुंचे कृपाशीर्वाद प्राप्त होवोत, ह्या प्रभुचरणीच्या आणखी एका नम्र विनंतीसह श्री गुरु माणिक, जय गुरु माणिक…

श्रीप्रभु आज्ञेत राहणे

खोडकर मुलगा
प्रभुंच्या लहानपणी एक लहान मुलगा एका गाभण म्हशीला फारच त्रास देत होता. मुक्या जनावरांनाही त्रास होतो, म्हणून त्या म्हशीला त्रास न देण्यासंबंधी प्रभुंनी त्या खोडकर मुलास वारंवार समजावले. शेवटी “आता म्हशीच्या अंगास हात लावून तर पहा… म्हणजे…” असे प्रभु बोलले. प्रभुंच्या बोलण्यातील मेख न कळल्याने, “काय होते पाहू…” असे म्हणून त्या मुलाने दोन्ही हात म्हशीच्या पाठीवर ठेवले. प्रभु हसतच म्हणाले, अरे, ती म्हैस फार वाईट आहे, तुझे हात धरून बसेल! पहा रे बुवा आपला विचार!” प्रभुंच्या तोंडूने हे शब्द निघताच, त्या मुलाचे दोन्ही हात म्हशीच्या पाठीला चिकटून बसले. त्याला ते मोकळे करता येईनात. म्हैस उधळली, मुलगा म्हशीला लोंबकळू लागला. सर्व मुलांना मोठी गंमत झाली. म्हैस पळते आहे, मुलगा लोंबकळत चालला आहे. मुलगा रडू लागला. “मेलो, मेलो, पुन्हा कधी असे करणार नाही”, असे म्हणू लागला. प्रभुंना त्याची ती केविलवाणी अवस्था पाहावेना. प्रभुंनी ताडकन उठून, पळत जाऊन त्या म्हशीला थांबविले. तिच्या पाठीवर हात फिरवून, “बाई, तो तुला पुन्हा त्रास देणार नाही. एकवार त्याला क्षमा कर. सोड त्याला”, असे म्हणताच, मुलाचे हात सुटले. सर्व मुलांना मौजच मौज झाली पण, त्या मुलाला मात्र खाशी अद्दल घडली.

अमृतकुंडावरील घटना
चितापूरच्या विठ्ठलराव पेशकरांचे वडील हे प्रभुंचे बालमित्र. मामांनी रागे भरल्यावर, प्रभुंनी कल्याणमधील मामांचे घर सोडले आणि श्रीप्रभु पेशकर व त्यांच्या आणखीन एका समवयस्काबरोबर मंठाळच्या अरण्यात शिरले. त्यावेळी त्या दोघांनी प्रभुंना तसे न करण्याबद्दल परोपरीने सांगितले. अरण्याची दोघांना भीती वाटत आहे असे पाहून, प्रभुंनी, “भिऊ नका, माझ्या मागोमाग या, तुमचे भाग्य उदयाला येईल”, असे सांगितल्यावर, ते दोघेही प्रभुंच्या मागे गुहेत शिरले. थोड्यावेळाने त्यांना एक शिळा दिसली व तिघांनी ती बाजूला करताच सर्वजण आतील गुहेत शिरले. त्या गुहेतील जागा अत्यंत स्वच्छ असून त्यात एक आगटी दिसली. जवळ एक चिमटा पडला होता आणि आगटीतील राख रसरशीत होती. थोडेसे पुढे जाताच, पहिल्यापेक्षा मोठी अशी आणखी एक काळी शिळा दृष्टीला पडली. ती दूर करण्याचा प्रयत्न त्या दोघांनी करून पाहिला. शेवटी प्रभु हसून म्हणाले, “आता पुरे करा, फक्त माझ्या धोतराचा पदर घट्ट धरून उभे रहा, भिऊ नका”, असे म्हणून प्रभुंनी एक जोराचा हिसडा देताच ती प्रचंड शिळा उलथून पडली. पण आतील गुहेतून एक भयंकर गर्जना ऐकू आली. ती एखाद्या प्रचंड वाघाची असावी, असा त्या दोघांचा भास होऊन ते घाबरून गेले व प्रभुंच्या धोतराचा धरलेला पदर सोडून, मागच्या पावली पळत सुटले. पळता पळता काहीतरी धाडकन पडल्याचा आवाज त्यांना ऐकू आला व त्याबरोबर वाघाची गर्जनाही झाली. त्यांनी असे अनुमान केले की, प्रभुंवर त्या वाघाने झडप घालून त्यांना खाऊन टाकले असावे. भीतीने गर्भगळीत होऊन ते धावत सुटले व थोड्याच अवधीत त्यांनी कल्याण गाठले. ह्या प्रकाराबद्दल कोणाजवळ ब्र काढण्याचीसुद्धा त्यांची हिम्मत झाली नाही. त्यानंतर दोन एक महिन्यांनी कल्याणची बरीच मंडळी अमृतकुंडावर निघालेली पाहून, ते दोघेही बरोबर दशम्या घेऊन निघाले. डोंगर चढून अमृतकुंडाजवळ येत असताना, त्यांना प्रभुंचे स्मरण होऊन, पूर्वी घडलेल्या प्रकाराबद्दल ते एकमेकांबरोबर बोलत होते, इतक्यात प्रभुंची स्वारी त्यांच्यासमोर दृष्टीस पडली. वाघाच्या गुहेतून प्रभु जीवंत बाहेर आल्याचे पाहून त्यांना नवल वाटले आणि प्रभुंचा चेहरा पूर्वीपेक्षाही अधिक तेजस्वी व प्रफुल्लित असलेला पाहून ते आश्चर्यचकित झाले. “हे असे कसे झाले?” असा प्रश्न त्यांनी प्रभुंना केला. त्यावर प्रभु म्हणाले, “तुम्ही न घाबरता माझ्यामागे आला असता तर, त्याचे मर्म समजले असते. आता काय उपयोग?”

प्रसादाची हकीकत
अक्कलकोटच्या राजास पुत्रप्राप्तीची इच्छा होती. शिवाय संस्थानाच्या बाबतीत काही भानगडीही होत्या. त्याचे निवारण व्हावे म्हणून कारभारी, कारकून वगैरे माणसे नेहमी प्रभुदरबारी येत. त्याप्रमाणे काही विश्वासू लोक एकदा प्रभुंकडे प्रार्थना करण्याकरिता आले होते. त्यांना, “मी बोलवीन तेव्हा या, म्हणजे प्रसाद देतो”, असे प्रभुंनी कळविले होते. त्याप्रमाणे प्रभुंकडून, “प्रसाद घेण्यास या”, असा निरोप आला. त्यावेळी हे गृहस्थ भोजनास बसले होते. बोलवण्यास येणाऱ्या इसमाने ते जेवावयास बसले आहेत, भोजन संपवून येतील, असा परत निरोप प्रभुंना कळवला. त्यावेळी प्रभु फक्त, “अरेरे, प्रसादाची वेळ त्याने गमावली”, असे बोलून स्वस्थ बसले. पुढे त्या गृहस्थाने प्रसाद मिळवण्याबद्दल पुष्कळ खटपट केली, पण प्रसाद मिळाला नाही. स्वतःच्या उल्हासाने प्रभुंनी हातांत घेतलेला प्रसाद मिळणे, हे भाग्याचे चिन्ह होते. पण तो योग त्या लोकांना लाभला नाही.

व्यंकम्मावर कृपा
मैलारास असताना प्रभुंनी व्यंकम्माला पुराच्या पाण्यातून जीवदान दिले होते. त्यानंतर तिला प्रभुंचा प्रसाद मिळाला आणि तिने प्रभुंकडेच राहण्याचा हट्ट धरला. आपले सर्व दागदागिने तिने प्रभुंना देऊन टाकले. प्रभुंनी व्यंकम्माचे अंतःकरण जाणले होते. निस्सिम आणि शुद्ध प्रेमाने ती ओथंबून गेली होती. ती जरी तरुण होती तरी, वैषयिक स्वार्थी प्रेमाचा तिच्याठायी पूर्ण अभाव होता, हे प्रभुंनी पक्के ओळखले होते. प्रभुंनी प्रसन्न अंतःकरणाने तिच्याकडे दृष्टीक्षेप करून, आपल्या मातोश्री बयाम्मामातेजवळ तिला घेऊन जाण्यास एका शिष्यास सांगितले. तिचे प्रभुंवरील उत्कट प्रेम व भक्ती पाहून प्रभुंच्या मातेसही आनंद झाला व मातोश्रींनी तिला आपल्या कन्येप्रमाणे जवळ बाळगिले. प्रभुंनी व्यंकम्माची नाना प्रकारे परीक्षा पाहिली. तिला कित्येक दिवस नुसत्या खारकेवर ठेवले, तरी ती डगमगली नाही. तिचा धिप्पाड देह खारकेप्रमाणे वाळून गेला हे पाहून, सर्वांना तिची करूणा आली. पण प्रभुआज्ञा उल्लंघण्याचे व्यंकम्माने कधी मनातदेखील आणले नाही. एके समयी, स्त्री स्वभावला अनुसरून विवस्त्र होऊन, व्यंकमा स्नान करीत होती, अशा प्रसंगी प्रभूंकडून निरोप आला, “असशील तशी निघून ये” हा निरोप कानावर पडताच, देहभान विसरून जाऊन, तशाच स्थितीत व्यंकमा प्रभुंकडे यावयास निघाली. सर्व लोक विस्मित झाले. मातोश्रींना हे वर्तमान कळल्याबरोबर, त्याही मागोमाग निघाल्या आणि त्यांनी तिला मध्येच थोपवून धरले. प्रभुने अशी भलतीच आज्ञा कशी केली, म्हणून त्यांना विचारण्याचा बयाम्मामातेचा हेतू होता. स्त्रियांचे खरे भूषण लज्जा हे होय. ते एकदा नाहीसे झाल्यावर, स्त्रीत्व कसे राहणार? असो, तशाच स्थितीतही व्यंकम्मा प्रभुआज्ञा प्रमाण मानून, प्रभुपुढे येऊन उभी राहावयास तयार झाली हे समजल्यावर, तिची ती अनुपम भक्ती पाहून, तो प्रेमाचा निधी उचंबळू लागला. अनिवार प्रसन्न अंतःकरणाने डोलू लागला. व्यंकम्मा जवळ येण्याची वाट देखील न पाहता, प्रभुंनी चटकन आपल्या अंगावरील शुभ्र वस्त्र काढून, तिच्या अंगावर घालण्याकरता मातोश्रीकडे पाठविले. त्यावेळी खरोखर व्यंकम्माचा उद्धार झाला. ही तरुण स्त्री म्हणजेच भगवती व्यंकम्मा होय. जीवनभर प्रभुआज्ञेत, प्रभुसाधनेत राहून ती शेवटी श्री देवीपदास पोहोचली.

वरील चारही कथा पाहिल्या तर आपल्याला “श्रीगुरु आज्ञा” हा समान धागा आढळतो. खोडकर मुलगा, पेशकर, किंवा अक्कलकोटच्या राजाचा कारभारी यांनी प्रभुआज्ञा पाळली नाही आणि पर्यायाने त्यांनी त्याचे परिणाम भोगले किंवा आपल्या भाग्योदयाची चालून आलेली संधी दडवली. ह्या उलट, व्यंकम्माने प्रभुंच्या मुखकमलातून निघालेला शब्द खाली पडू न देता, तो प्रमाण मानला आणि आपला पारमार्थिक उत्कर्ष साधून घेतला. वरील कथांच्या माध्यमातून श्री गुरुआज्ञेचे महत्त्व आपल्या सहज ध्यानात येते. कारण, आपले नेमके हित कशात आहे, याची पूर्ण जाणिव आपल्या गुरूला असते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत गुरुआज्ञेत राहणे, हे सदासर्वथा हितकर असते. भक्तकार्यकल्पद्रुम गुरुसार्वभौम श्री सद्गुरू माणिक प्रभु महाराजांचा जयजयकार असो.

झोळीपूजा आणि अन्नपूजा

झोळीपूजा आणि अन्नपूजा – माणिकनगर येथील एक सुंदर, वैशिष्ट्यपूर्ण परंपरा

माणिकनगर येथील वास्तव्यामध्ये झोळीपूजा आणि अन्नपूजा या दोन विशेष पूजांनी माझे मन अनेकदा वेधून घेतले. इतर दत्तक्षेत्रांमध्ये ही परंपरा सहसा आढळून येत नाही. अनेक वर्षांपासून चालत आलेल्या ह्या नितांतसुंदर अशा परंपरेचा मागोवा घेतला असता, अनेक भक्तमंडळी झोळीपूजा आणि अन्नपूजा करतात असे कळाले. श्रीप्रभुप्रती कृतज्ञता म्हणून मुख्यत्वे होत असलेल्या ह्या दोन पूजेंची माहिती इतरांसही मिळावी, आणि त्यांनीही प्रभुची कृपा संपादन करण्याची संधी मिळावी, म्हणून हा अल्पसा लेखन प्रपंच.

श्रीप्रभुंनी लहानपणी मामाचे घर सोडल्यावर, मंठाळच्या अरण्यात अमृतकुंडावर एकांतात साधना केली आणि प्रत्यक्ष श्रीदत्तात्रयांनी तेथे प्रभुंना झोळी आणि सटक्याचा प्रसाद दिला, हे सर्वश्रुतच आहे. त्यानंतरही ह्या झोळीचा आणि पर्यायाने श्री अन्नपूर्णा मातेचाच अखंड वरदहस्त श्री प्रभुसंस्थानावर आहे, ज्याच्या प्रसादस्वरूप श्री संस्थानामध्ये आजतागायत अन्नधान्याची आणि प्रसादाची कधीही कमतरता जाणवली नाही. श्रीमाणिक प्रभुंनीही आपल्या अवतार काळामध्ये, सदैव भिक्षान्न स्वीकारले. पंचपक्वान्नाचे जेवण असले तरी प्रभु झोळीमधील भिक्षा किंवा माधुकरीच घेत. श्री माणिक चरितामृतामध्येही चोवीसाव्या अध्यायात भिक्षेचे महत्त्व विस्ताराने वर्णिले आहे. त्यामुळे सकलमत संप्रदायांमध्ये आणि समस्त प्रभुभक्तांमध्ये भिक्षेच्या झोळीचे विशेष महत्त्व आहे. झोळीची ही परंपरा श्री माणिकप्रभुंच्या काळापासून आहे.

श्री माणिकप्रभुंच्या संजीवन समाधीनंतर श्री मनोहर माणिकप्रभुंच्या काळात झोळीपूजेची परंपरा सुरू केली ती आजतागायत अव्याहतपणे सुरू आहे. देह रूपाने श्रीप्रभु जरी समाधीस्थ झाले, तरी चैतन्य स्वरूपाने ते आपल्यातच आहेत, आणि त्यांच्या नैवैद्याकरिता अखंड सुरू असलेले नित्यभिक्षेचे विधान, हे श्रीमाणिक प्रभु संस्थानाच्या आस्था आणि विश्वासाचे परमविशेष आहे. भिक्षेसाठी आजही झोळी माणिकनगरमध्ये पाच घरी फिरते आणि प्रभुंच्या नैवेद्यासाठी भिक्षा आणली जाते.‌ जे भक्त माणिकनगरात राहत नाहीत, पण त्यांना झोळी घालण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी ही झोळीपूजेची व्यवस्था साक्षात् प्रभुंनीच जणू अत्यंत कृपाळूपणे केली आहे.

झोळीपूजेमध्ये झोळीमध्ये प्रभुंचा छोटा सटका असतो, त्याची मुख्यत्वे पूजा होते. त्याला स्नान घालून, गंध लावून सटक्याची पूजा केली जाते. त्यानंतर पूजेच्या वेळी नैवेद्याचे जे मंत्र म्हटले जातात, ते मंत्र म्हणून त्यावेळी झोळीमध्ये यथाशक्ती नैवेद्य, शिधा ठेवला जातो. त्यानंतर झोळी बंद करून, पुन्हा झोळीची गंध वैगरे लावून पंचोपचार पूजा होते, नैवेद्य दाखवून, आरती केली जाते. आजही जुन्या प्रभुंभक्तांमध्ये (श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासूनच्या) आजही काही मंगलकार्य, जसे लग्न किंवा मुंज वगैरे पार पडली की, त्यानंतर ते भक्त माणिकनगरला प्रभुमंदिरात येऊन झोळीपूजा करतात. विद्यमान प्रभुपरिवारामध्येही ही परंपरा आवर्जून पाळली जाते. ह्या वेळेस झोळी घेणाऱ्या ब्रह्मचाऱ्याचीही हार घालून, आरती करून पूजा केली जाते. एकंदरीतच झोळी पूजा ही प्रभुंच्या ब्रह्मचारी स्वरूपाची किंवा अवधूत दिगंबर किंवा माधुकरी वृत्तीचीच पूजा आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

अन्नपूजा ह्या पूजा विधीमध्ये श्रीप्रभुसमाधीस दहीभाताचे लिंपण केले जाते आणि नंतर हा दहीभात भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो. अन्नपूजेचा संबंध महादेवाच्या पूजेशी आहे. रुद्र अनुष्ठानाची सांगता अन्नपूजेने होते. साधारणतः शंकराच्या पिंडीला अशा प्रकारचे दहीभाताचे लिंपण केले जाते. काही ठिकाणी देवीलाही दहीभाताचे लिंपण करून अन्नपूजेचा विधी पार पडला जातो. हलाहल प्राशन केल्यामुळे शरीराला झालेला दाह कमी व्हावा, या भावनेने श्रीशंकरास दहीभाताच लिंपण आणि असुरांशी युद्ध केल्यावर, देवीला आराम मिळावा म्हणून दहीभाताचं लिंपण करण्याची परंपरा पूर्वापारपासून अनेक ठिकाणी चालत आली आहे. माणिकनगरातही प्रभुसमाधीस अन्नपूजेची परंपरा गेले अनेक वर्षे अखंड सुरू आहे.

प्रभु समाधीच्या अन्नपूजेच्या ह्या प्रथेचा मागोवा घेतला असता, श्री मार्तंड माणिक प्रभुंच्या काळापासून अन्नपूजेची प्रथा सुरू झाल्याचे कळते. श्री माणिक प्रभुंचे शिष्य असलेले दुबळगुंडीचे रामण्णापंत यांना, श्रीप्रभु जयंतीच्या दरबाराची सांगता अन्नपूजेने करा, अशी आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली आणि तेथूनच ह्या अन्नपूजेची परंपरा सुरू झाली. त्यानंतरच्या श्रावणमासाच्या अनुष्ठानाची सांगता, श्रावण मासाच्या शेवटच्या दिवशी पुजारी वर्गाने अन्नपूजेने करावी, अशी ही आज्ञा श्री मार्तंड माणिक प्रभुंनी केली. श्रावण मासाच्या अनुष्ठान समाप्तीच्या अन्नपूजेनंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच, भाद्रपद प्रतिपदेला श्रीप्रभु गादीच्या पीठाधीशांच्या परिवाराकडून श्रीप्रभु समाधीची अन्नपूजा केली जाते. आजही प्रभुंचे नवरात्र दुबळगुंडीच्या रामण्णापंतांच्या कुटुंबाकडे आहे व ते माणिक नगरी येऊन ही प्रभू सेवा करतात. त्यांची अन्नपूजा पाहून इतरांनाही या अन्नपूजेची प्रेरणा झाली. आपले काही काम अडले असल्यास, मी प्रभुची अन्नपूजा करेन, असा नवस अनेक प्रभुभक्त करतात किंवा प्रभुगादीच्या पीठाचार्यांनीही आपल्या भक्तांना, तुमचे काम होईल, काम झाल्यावर प्रभुसमाधीची अन्नपूजा करा, असे अनेकदा सांगितल्याचे कळते. थोडक्यात, प्रभुप्रती कृतज्ञता किंवा नवस पूर्ततेचा विधी म्हणून अन्नपूजेकडे आपल्याला पाहता येईल.

ह्या अन्नपूजेचेही मोठे वैशिष्ट्यपूर्ण विधान आपल्याला माणिकनगरी पहायला मिळते. चांदीच्या घंगाळवजा पातेल्यात (ह्याला कन्नड भाषेत कोप्परगी असं म्हणतात) पाच एक किलो दहीभात असतो आणि चांदीच्या पात्रामध्ये अकरा वडे असतात. अन्नपूजेच्या वेळेस हे दहीभात प्रभुमंदिरात ठेवले जाते. श्रीप्रभु समाधीची महान्यासपूर्वक रुद्राभिषेक महापूजा होते. त्यानंतर प्रभूंना वस्त्रसाज केल्यावर, जेव्हा नैवेद्याचे मंत्र येतात त्यावेळी, श्रीप्रभु समाधीस पडदा केला जातो आणि श्रीप्रभु समाधीवर छाटी ठेवली जाते. त्यावर हा दहीभात पसरवला जातो. ह्यावेळी भृगुवल्लीतील अन्नपूजेचे मंत्र म्हटले जातात. श्रीप्रभु समाधीवर पसरवलेल्या दहिभातावर वडे ठेवले जातात. आणि श्रीप्रभु समाधीला हळदीकुंकू वाहिले जाते. त्यानंतर पसरवलेल्या दहीभातावर पुन्हा एक छाटी टाकली जाते आणि त्यावर गिलाफ (प्रभू समाधीस चारी बाजूंनी घालण्यात येणारे वस्त्र) घातला जातो. गिलाफ घातल्यावर शाल आणि अलंकार घातले जातात. त्याचबरोबर श्रीप्रभु समाधीसमोर आणखी एका ताटात दहिभात ठेवतात आणि ह्या दहीभाताचा नैवेद्य दाखविला जातो, श्रीप्रभु समाधीची आरती केली जाते. त्याचबरोबर यजमानाच्या नवसाच्या पूर्णतेच्या / समाप्तीचा संकल्प सोडला जातो. दोन नारळ फोडले जातात आणि समाधीवर अक्षता टाकून गिलाफ काढला जातो. त्यानंतर श्रीप्रभु समाधीवर असलेलया अन्नपूजेच्या दहीभाताचा प्रसाद गोळा केला जातो. त्यावेळीही पुन्हा उपनिषदातील मंत्र म्हटले जातात. दहीभात पूर्ण टिपून घेतल्यावर, श्रीप्रभु समाधीस स्नान घालून, पुन्हा पंचोपचार पूजा होते आणि वस्त्रालंकार घालून प्रभुंची आरती करून पुष्पांची नेहमीप्रमाणे सजावट करतात. श्रीप्रभु समाधीची ही पूजा पूर्ण झाल्यावर, यजमानांना वडे आणि दहीभात प्रसाद म्हणून दिला जातो आणि उरलेला दहिभात प्रभू मंदिरात असणाऱ्या सर्व भक्तांना प्रसाद म्हणून वाटला जातो.

एकादशी, महाशिवरात्री, श्रावण मास आणि दत्त जयंतीच्या उत्सवाचे पाच दिवस अन्नपूजा केली जात नाही.

थोडक्यात आपल्या घरातील मंगल कार्य पार पडल्यावर झोळीपूजा करण्याचा आणि नवस फेडण्यासाठी म्हणून किंवा संकल्प पूर्तीसाठी अन्नपूजा करण्याची परंपरा, अनेक प्रभुभक्तांकडून आजही सुरू असल्याचे आपल्याला पाहता येते. आपल्या घरातील मंगल कार्यात श्रीप्रभु आपल्याला काहीही कमी न पडू देता आपली झोळी सदैव भरलेली ठेवतो आणि अशा ह्या भक्तकार्यकल्पद्रुम प्रभुप्रती प्रेम अथवा कृतज्ञता म्हणून झोळीपूजेचे आणि अन्नपूजेचे विधान प्रभुभक्तांमध्ये प्रचलित आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या किंवा नविन भक्तांना जर अशी पूजा करायची इच्छा असल्यास आणि आगाऊ सूचना दिल्यास श्री संस्थानाकडून तशी व्यवस्था अत्यंत अल्प दरात केली जाते. झोळीपूजा आणि अन्नपूजा ह्या वैशिष्ट्यपूर्ण विधींची माहिती दिल्याबद्दल श्री माणिक प्रभु संस्थानाचे मुख्य अर्चक श्री. गुरुनाथ गुरुजी ह्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो. अन्नपूजा किंवा झोळीपूजेच्या निमित्ताने आपणासही प्रभुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी शीघ्रातीशीघ्र प्राप्त होवो, आणि त्याच्या फलस्वरूप आपली ही झोळी श्रीप्रभु कृपेने निरंतर भरलेली राहो, ह्या श्रीप्रभु चरणीच्या आणखीन एका लडिवाळ विनंतीसह श्री गुरु माणिक जय गुरु माणिक

श्रीप्रभुमनोहराख्यान

श्रीमाणिकप्रभुंचा लहान भ्राता ।
नृसिंहतात्या नामे विख्याता ।
विठाबाई पत्नी पतीव्रता ।
तात्या महाराजांची ॥१॥

नाईक घराण्याची वंशवेल ।
नृसिंहतात्याच आता फुलवेल ।
दत्तप्रसाद लवकरच भेटेल ।
आशीर्वचन श्रीमाणिकप्रभुंचे ॥२॥

होते कालयुक्ति नाम सवंत्सर ।
श्रावण अमावास्या दिवस थोर ।
पुलकित झाले माणिक नगर ।
नांदी मनोहर अवताराची ॥३॥

श्रावणमास उत्सवाचा अंतिम दिवस ।
कृष्णमेघांनी व्यापिले सकल आकाश ।
सूर्यदेवही व्याकुळ दर्शन घेण्यास ।
महायोगी बालकाचे ॥४॥

नऊमास पूर्ण झाले गर्भधारणास ।
परी न दिसे प्रसूतीचे काही चिन्हास ।
काळजी अत्यंत लागली विठाम्मास ।
धावा प्रभुचा करितसे ॥५॥

सकळजन चिंता करिती ।
श्रीमाणिकसी येऊनि विनविती ।
होऊदे विठाम्माची प्रसुती ।
निर्विघ्नपणे प्रभुराया ॥६॥

कनवाळू श्रीमाणिक कृपाघन ।
आला विठाम्मापाशी धावून ।
विठाम्मा विव्हळे कळवळून ।
कृपादृष्टी अवलोकी ॥७॥

गर्भस्थ शिशूस संबोधून ।
श्रीमाणिक बोले प्रेमवचन ।
मातेसी ऐसे छळण ।
योग्य नव्हे ॥८॥

जन्म घेणे आपणांसी क्रमप्राप्त ।
रहाल सदैव संसार बंधमुक्त ।
माणिक वचनी होऊनी आश्वस्त ।
प्रकटावे शीघ्रातीशीघ्र ॥९॥

ऐकोनी श्रीमाणिकप्रभुची विनंती ।
पुढील अवतारकार्याची निश्चिती ।
माणिकवचने मिटली भ्रांती ।
नवजात अर्भकाची ॥१०॥

विठाम्माउदरी अत्रि अंश आला ।
मनोहर नामे श्रीगुरू अवतरला ।
वाढवील जो ब्रह्मचर्य व्रताला ।
आधारभूत होऊनिया ॥११॥

मुखमंडलाची प्रभा ऐसी ।
फाकली दहाही दिशी ।
बैलपोळ्याचा सणही त्यादिवशी ।
हर्षोल्हास चोहीकडे ॥१२॥

बैल आपापले सजवून ।
येती माणिकदर्शना घेऊन ।
सवाद्ये होतसे बैलपूजन ।
अवघा आनंदसोहळा ॥१३॥

पंचक्रोशीतील आले समस्त जन ।
प्रभुसहित घेती बालकाचे दर्शन ।
टाकीले मन सर्वांचे मोहून ।
मनोहर नाम यथार्थ ॥१४॥

नाम ठेविले मनोहर ।
जाणा तोचि विधीहरीहर ।
जग तारावया भूमिवर ।
मनोहररूपे अवतरला ॥१५॥

ऐसा अवतार मनोहर ।
सकलमताचा पुढील धरोहर ।
माणिकप्रभु जाणती खरोखर ।
आपुल्या अंतरात ॥१६॥

हा जरी अल्पायुषी होईल ।
सवाई माणिकप्रभु म्हणवून घेईल ।
सर्वश्रुत माणिक प्रभुंचे बोल ।
सहजी जे निघाले ॥१७॥

एकदा काय नवल घडले ।
प्रभु गादीवरी अप्पासाहेब बैसले ।
पाच वर्षाचे बालक सानुले ।
प्रभु दरबारामाजी ॥१८॥

करती प्रभु बैठकीचे अनुकरण ।
तैसेच गंभीर स्वरूप धारण ।
समस्त करिती मनोहराचे अवलोकन ।
प्रभु पातले तत्क्षणी ॥१९॥

बाळ मनोहरासी पाहुनी ।
बैसला गादीसी बळकावूनी ।
बोलती तयासी हांसूनि ।
कृपानिधी प्रभुमहाराज ॥२०॥

माझी गादी तुला हवी का रे ।
आता मी काय सांगतो ऐक रे ।
गादीवर बैसता दागिने सारे ।
दान करणे दुस-यासी ॥२१॥

अप्पासाहेब प्रभुसी वदती सत्वर ।
सांगेन त्यासी देण्यास तयार ।
दागिने सगळे काढून भरभर ।
ठेविले प्रभुपुढे ॥२२॥

पाहुनि वैराग्याची मूर्तीमंत मूर्ती ।
माणिक प्रभु मनोमन संतोषती ।
लहानशी गादी मांडून बैसविती ।
शेजारी बालमनोहरास ॥२३॥

वैराग्याची महाकठीण स्थिती ।
कृतीतून सहज दाखविती ।
दातृत्वाची तीच माणिकवृत्ती ।
मनोहराठायी उपजली ॥२४॥

प्रभुसमाधी समय जवळ येता ।
भक्तांस लागली उत्तराधिका-याची चिंता ।
कोण संभाळील प्रभुगादीस आता ।
खलबते नानाविध ॥२५॥

जरी तात्यासाहेबांचे पुत्र दोन ।
परी होते लहान आणी अज्ञान ।
एकाचे वय सात, एकाचे तीन ।
सर्वार्थे अयोग्य म्हणती ॥२६॥

भालकीस होता एक युवक ।
मच्छिंद्रराव नामे प्रभुंचा सेवक ।
प्रभुगादी चालविण्यांस तोच लायक ।
धारणा अनेकांची ॥२७॥

बालपणापासून होता लाडका प्रभुंचा ।
प्रभुंचाही व्यवहार अत्यंत प्रेमाचा ।
करतील विचार प्रभु मच्छिंद्ररावाचा ।
गादीवर बैसविण्यास ॥२८॥

उतावीळ होती भक्तजन ।
मच्छिंद्ररावास मेण्यात बैसवून ।
घेऊन येती भालकीहून ।
सवाद्ये मिरवणूक ॥२९॥

भक्तांनी आणली एक गादी ।
प्रभुंच्या उत्तराधिकाराची जी नांदी ।
गादीवर बैसविले प्रभु संन्निधी ।
मच्छिंद्ररावास ॥३०॥

त्याच रात्रीस लीला घडली ।
मच्छिंद्ररावाची गादी खाक झाली ।
ज्या प्रभुगादीची स्वप्न पाहिली ।
नव्हती ती नशीबांत ॥३१॥

काहीच झाले नाही समजून ।
भक्त करिती प्रयत्न परतून ।
प्रभु मच्छिंद्ररावास मांडीवर बैसवून ।
कधी घेतील ॥३२॥

ऐसी उत्कंठा शिगेस पोहोचत ।
वदंता उठली प्रभु दरबारात ।
चाळीस हजाराचे कर्ज असत ।
प्रभुमहाराजांवरी ॥३३॥

जो कोणी उत्तराधिकारी होईल ।
तोच ह्या कर्जासी चुकविल ।
फकिरी संस्थान, कैसे होईल ।
मच्छिंद्रराव विवंचनेत ॥३४॥

मानाची जरी गादी घ्यावी ।
कर्जाची धोंड गळी पडावी ।
पेक्षा आपली भालकी गाठावी ।
हेच बरे ॥३५॥

एकादशीस जेव्हा समाधीत बैसती ।
मच्छिंद्ररावास प्रभु सांगावा धाडती ।
भालकीस पळून गेल्याचे सांगती ।
शिष्य प्रभुमहाराजांस ॥३६॥

प्रभुगादी चालविणे सोपे नाही ।
योग्य अधिकाराविणा शक्य नाही ।
ये-यागबाळ्यास हे झेपणे नाही ।
म्हणे प्रभु माणिक ॥३७॥

मार्गशीर्ष एकादशीचा पुण्य दिवस ।
निश्चित केला संजीवन समाधीस ।
नृसिंह तात्यांच्या उभय पुत्रांस ।
बोलाविणे धाडिले ॥३८॥

येता उभयतां मांडीवर बैसविले ।
क्षण दोन त्यांसवे घालविले ।
आरती पुजापाठ विधीवत करविले ।
सप्रेमे माणिकप्रभुने ॥३९॥

मनोहरास पांघरविला अंगावरील दुशाला ।
प्रसादरूपी घातली गळ्यात माळा ।
मंत्रोपदेश देऊनि प्रसाद दिधला ।
लहानग्या मनोहरास ॥४०॥

असला वयाने लहान जरी ।
बालमनोहर हाच माझा उत्तराधिकारी ।
दत्तगादीची सेवा करील परोपरी ।
प्रभु वदे अंतिमक्षणी ॥४१॥

अवघ्या सातव्या वयात पीठारोहण ।
मनोहराच्या सामर्थ्याची प्रभुंस जाण ।
आपल्या पाठीमागे संस्थानाचे मोठेपण ।
वाढविल निश्चित ॥४२॥

चालविल सकलमत संप्रदाय परंपरा ।
म्हणतील सवाई माणिकप्रभु दुसरा ।
मनोहरावर ठेऊनि भार सारा ।
प्रभु जाहले समाधिस्त ॥४३।।

बालमनोहरावर ठेऊनि सारी भीस्त ।
श्रीप्रभु झाले संजीवन समाधिस्त ।
कैसी लागेल प्रभुदरबारास शिस्त ।
चिंता समस्तांसी ॥४४॥

प्रभुसमाधीनंतर पहिलाच दरबार ।
लोटला भक्तजनांचा सागर ।
प्रभुसिंहासनावर बालमूर्ती मनोहर ।
सुहास्य वदनी ॥४५॥

दृष्टी समस्तांची मनोहर मुखमंडलावर ।
म्हणती श्रीमाणिक बालमूर्ती खरोखर ।
जो तो आपापल्या वृत्तीनुसार ।
प्रभुसी पाहे मनोहरात ॥४६॥

गादीवर बैसता कर्जाची हकीकत ।
कर्तव्यदक्ष मनोहरप्रभु जेव्हा जाणत ।
यादी बनविण्याचे फर्मान काढत ।
कोणाचे किती देणे ॥४७॥

अप्पासाहेब सांगती बाप्पाचार्यांस ।
निरोप धाडणे देणेक-यांस ।
पत्रे पाठवूनी येण्यास ।
सत्वर सांगितले ॥४८॥

एकेक करोनि जमले सावकार ।
प्रमुख त्यात गोसावी किसनगीर ।
देणे त्याचे दहा हजार ।
श्रीप्रभुंचे होते ॥४९॥

हिशोब कर्जाचा किसनगीरासी विचारता ।
सविनय बोले तो तत्वता ।
प्रभुंना कर्ज देण्याची योग्यता ।
सर्वार्थे नाही माझी ॥५०॥

प्रभुकृपेनेच लक्षावधी नफा जाहला ।
परी दानधर्म नाही काही घडला ।
दहा हजार देता श्रीप्रभुला ।
दानधर्म अनायसे ॥५१॥

ते नव्हतेच कधी ऋण ।
परतफेडीचा नाही काही प्रश्न ।
मनीचे सारे द्वंद्व काढून ।
निश्चिंत व्हावे ॥५२॥

ऐकोनि किसनगीराचे मृदुवचन ।
अप्पासाहेब संतोषले मनोमन ।
किसनगीरास देऊनि पुढारीपण ।
तडजोड करावया इतरांसी ॥५३॥

किसनगीर अत्यंत हजरजबाब ।
देयराशी निश्चिती ताबडतोब ।
मांडूनि यथायोग्य हिशोब ।
अप्पासाहेबांपुढे ठेविती ॥५४॥

पाहुनि एवढ्या मोठ्या रकमेस ।
जनांची उत्सुकता पोहोचली शिगेस ।
अप्पासाहेब शांत त्याही समयास ।
बैसले दरबारात ॥५५॥

एवढ्यात पहा नवल घडले ।
दरबारात सुखद वृत्त धडकले ।
प्रभुसेवार्थ काही दान धाडले ।
विठ्ठलराव तालुकदाराने ॥५७॥

थोडे थोडके नव्हे गाडीभर ।
उतरला कर्जाचा सर्व भार ।
निमित्तमात्र विठ्ठल तालुकदार ।
कर्ताकरविता श्रीमाणिक ॥५७॥

सावकारांचे कर्ज फेडून ।
आशीर्वचन प्रसाद देऊन ।
समस्तांचे आभार मानून ।
आनंद वर्तला ॥५८॥

बाप्पाचार्य मुख्य कारभारी ।
अप्पासाहेबांची पाहून कर्तबगारी ।
वंदिती चरण वारंवारी ।
बालमनोहराचे ॥५९॥

माणिकप्रभु जयंतीची पौर्णिमेची रात्र ।
मनोहरप्रभु करिती महापूजा प्रभुमंदिरात ।
अतोनात गर्दी प्रभुमंदिर परीसरात ।
घ्यावया प्रभुदर्शन ॥६०॥

झाली महानैवेद्याची वेळ ।
सदाशिवराव नेसून सोवळ ।
भंडारखान्यातून नैवेद्याची थाळ ।
घेऊनि येती ॥६१॥

नैवेद्य घेऊन येता प्रभुमंदिरात ।
म्हातारा एक बैसला वाटेत ।
लपेटून घेतले स्वतःस घोंगडीत ।
अस्ताव्यस्त ध्यान ॥६२॥

स्पर्श झाला म्हाता-यास चुकून ।
विटाळ प्रसादास झाला म्हणून ।
म्हाता-यास अद्वातद्वा बोलून ।
गेले परतोनी ॥६३॥

अभ्यंग स्नान करून ।
स्वयंपाक पुन्हा करून ।
सोवळ्यात महानैवेद्य घेऊन ।
सदाशिवराव पातले ॥६४॥

पूजा संपल्यावर स्वस्थ झोपले ।
स्वप्नी श्री माणिकप्रभुच आले ।
सदाशिवरावास प्रभु बोलले ।
ऐका एकचित्ते ॥६५॥

आलो जत्रेची मजा पहावया ।
घेऊनि येसी माझिया नैवेद्या ।
माझाच स्पर्श होता तया ।
विटाळ कैसा ॥६६॥

सदाशिवराव अत्यंत शरमिंदे झाले ।
माफी मागण्या मनोहरप्रभुंकडे आले ।
पाय धरण्या पुढे सरसावले ।
मनोहर प्रभुरायाचे ॥६७॥

पाय धरावया जैसे वाकले ।
मनोहर प्रभु मागे झाले ।
नको सदाशिवराव, पुरे झाले ।
विटाळ उगाच होईल ॥६८॥

मनोहरप्रभुंच्या अंतर्ज्ञानित्वाची जाण ।
सदाशिवरावास झाली मनोमन ।
मनोहरप्रभुस जाऊन शरण ।
करूणा भाकतसे ॥६९॥

भक्तवत्सल प्रभु मनोहर ।
सदाशिवरावास वदति साचार ।
जयंती उत्सवात येती खरोखर ।
विविधरूपे प्रभुमहाराज ॥७०॥

सर्व रूपे हा श्रीप्रभु जाण ।
चित्तात ठेवावी हीच खूण ।
भेदभाव सदा सर्वदा सारून ।
सेवावे प्रभुचरण ॥७१॥

मनोहर प्रभु परम मातृभक्त ।
भावा बहिणीवरही प्रेम अत्यंत ।
परी होते वैराग्य मूर्तिमंत ।
त्यांच्या ठायी ॥७२॥

जडला एकदा काही आजार ।
मनोहरप्रभु होती त्याने बेजार ।
लोकाबापू वैद्य दर्शनार्थ हजर ।
होते त्यावेळी ॥७३॥

लोकाबापू करती विशेष यत्न ।
श्रीप्रभुंस आला तात्काळ गुण ।
उंचीवस्त्रे, द्रव्य, प्रसाद देऊन ।
यथोचित गौरविले ॥७४॥

मनोहरप्रभुंच्या गळ्यात एकमुखी रूद्राक्ष ।
श्रीमाणिकप्रभुंनी दिधला प्रसाद प्रत्यक्ष ।
लोकाबापूंचे पडता त्यावरी लक्ष ।
इच्छा होय प्राप्तीची ॥७५॥

मनी रूद्राक्षाचा लोभ वर्तत ।
परी मुखे काही न बोलवत ।
मनकवडे मनोहरप्रभु सर्व जाणत ।
लोकाबापूच्या मनींचे ॥७६॥

जरी लोकाबापू मनीचा हेतू पुरवावा ।
परी सर्वांसमोर रूद्राक्ष कैसा द्यावा ।
परतती लोकाबापू जेव्हा आपुल्या गावा ।
प्रभु येती सोडण्या ॥७७॥

आले चालत संगमापर्यंत ।
लोकाबापूंस बोलावून एकांतात ।
रूद्राक्ष घातला गळ्यात ।
अविलंब प्रभुने ॥७८॥

मनोवांछित जे प्राप्त झाले ।
प्रभुने आपले अंतरंग जाणीले ।
लोकाबापू वैद्य चरणी लागले ।
अंतर्यामी मनोहरप्रभुंच्या ॥७९॥

विठाम्माची प्रबळ इच्छा अंतरात ।
मनोहराने अडकावे विवाह बंधनात ।
इतरांसही पडे विचार पसंत ।
अनुमोदन सर्वांचे ॥८०॥

श्रीप्रभु पाळती नैष्ठिक ब्रह्मचर्य ।
त्यांस विचारण्याचे होईना धैर्य ।
कैसे होईल विवाह कार्य ।
चिंता समस्तांसी ॥८२॥

प्रभुंची वडील भगिनी मुक्ताबाई ।
तिच्या विवाहाची अपूर्व नवलाई ।
उपाध्यायाचा मुलगा केला जावई ।
सालंकृत कन्यादान ॥८२॥

मनोहरप्रभु पंधरा वर्षाचे झाले ।
माणिक नगराचे रूप पालटले ।
शोभिवंत अनेक मांडव उभारले ।
जय्यत तयारी विवाहाची ॥८३॥

परी विवाह कुणाचा कळेना ।
नवरा नवरीचा उलगडा होईना ।
प्रभुमहाराज अडकतील विवाह बंधना ।
अटकळ काहीजणांची ॥८४॥

समग्र तयारी झाली तरी कळेना ।
नवरा नवरी यांचे गूढ उकलेना ।
विठम्मा पुसतसे शेवटी प्रभुंना ।
विवाहसोहळ्या संबंधी ॥८५॥

मनोहरप्रभु वदती विठाम्मास ।
पाळितो आम्ही ब्रह्मचर्यास ।
नवरी पाहिली खंडेरायास ।
विवाहसोहळा खंडीचा ॥८६॥

आठवले माणिकप्रभुंचे विधान ।
जन्मसमयी जे केले कथन ।
ब्रह्मचर्य व्रतास आधार प्रदान ।
करील मनोहर ॥८७॥

मातोश्रीस अती आश्चर्य सखेद ।
परी मिटवूनी अंतरीचा भेद ।
शहाणपणे सोडून दिला नाद ।
मनोहराच्या विवाहाचा ॥८८॥

बाप्पाचार्यांची मुलगी असे पसंत ।
तिजसवे विवाह केला निश्चित ।
मातोश्रीही त्यास होकार देत ।
लग्नसोहळा थाटात ॥८९॥

खंडेरायाचा पार पडला विवाहसोहळा ।
वंशविस्ताराचा मार्ग झाला मोकळा ।
पुत्रविवाह देखिला आपुल्या डोळा ।
समाधान विठाम्माचे ॥९०॥

मनोहरप्रभु परम योगी थोर ।
नित्य योगाभ्यास करती अपार ।
माणिकप्रभु समाधीपाठी तळघर ।
करवून घेतले ॥९१॥

आखून दिलेल्या नमुन्यानुसार ।
परीपूर्ण जाहले तळघर ।
पाहण्या आले प्रभुमनोहर ।
कारभारी मंडळींसह ॥९२॥

तळघरात होत्या तीन कमानी ।
बांधकाम पडले प्रभुंच्या पचनी ।
मधल्या कमानीत आसन घालोनी ।
प्रभुमहाराज बैसले ॥९३॥

नुरला पारावार त्यांच्या आनंदास ।
निघती उद्गार त्या समयास ।
एखाद्या योगी समाधीस्त होण्यास ।
अत्युत्तम स्थान हे ॥९४॥

वरील घटनेस लोटले षण्मास ।
अश्विन कृष्ण सप्तमी तिथीस ।
अचानक बदल झाले प्रकृतीस ।
श्रीमनोहर प्रभुंच्या ॥९५॥

खंडेराव जाणती विद्याशास्त्र सकळ ।
संस्थान गादी सांभाळण्या सबळ ।
अवतार समाप्तीची हीच वेळ ।
ठरविले मनोमन ॥९६॥

जरी प्रभुमहाराज गंभीर अत्यंत ।
धीर देऊनि करिती सकलांस शांत ।
विधीवत चतुर्थाश्रम घेतला क्षणांत ।
वंदिती मातोश्रीस ॥९७॥

आपला कनिष्ठ बंधू खंडेरावास ।
उपदेश देऊन दिधले प्रसादास ।
प्रसाद देऊनि भक्त मंडळीस ।
तोषविले सर्वांस ॥९८॥

सिद्ध करूनि आसन ।
देह केला विसर्जन ।
चैतन्यात मिसळले चैतन्य ।
अवतार मनोहर ॥९९॥

शोक जाहला अनावर ।
दुःखात बुडाले माणिकनगर ।
कैसा घालावा आवर ।
भावनेस आता ॥१००॥

पुढील विधी यथाशास्त्र केला ।
आणेनी बैसविले संजीवन देहाला ।
मधल्या कमानीत बैसाकार केला ।
होता तेथेची ॥१०१॥

वयमान अवघे एकोणिस ।
घेतले संजीवन समाधीस ।
नैष्ठिक ब्रह्मचार्याचा कळस ।
मनोहर अवतार प्रभुंचा ॥१०२॥

रूप जयाचे अतीव मनोहर ।
वाणीही तैसीच गोड मधुर ।
अत्यंत लाघवी मोहक सुकुमार ।
श्रीप्रभु मनोहर ॥१०३॥

अवघ्या सातव्या वयात पीठारोहण ।
एकोणीसाव्या वर्षी अवतारकार्य पूर्ण ।
बारा वर्षात माणिकनगर संस्थान ।
वाढविले मनोहरप्रभुंनी ॥१०४॥

गवंडी संतरामदादा प्रख्यात ।
घेऊन त्यांसी विश्वासात ।
प्रभुमंदिर निर्मिले अद्भूत ।
शान माणिकनगराची ॥१०५॥

अत्यंत भव्य आणि सुंदर ।
मंदिर बांधले माणिकप्रभु समाधीवर ।
स्थापत्यकलेचा ऐसा नमुना आजवर ।
झाला नाही ॥१०६॥

अचाट प्रभुत्व संस्कृत भाषेवर ।
तैसा योगाभ्यासही करती धुरंधर ।
स्तोत्र, मंत्र निर्मिले अपार ।
संस्थान उत्सवासाठी ॥१०७॥

ठेवूनि परंपरेचा मान ।
राखूनि संप्रदाय अभिमान ।
आखून दिले नित्यपूजाविधान ।
आजतागायत चालतसे ॥१०८॥

काव्य प्रतिभाही तैसिच अलौकिक ।
स्तोत्र, श्लोक आणि अनेक अष्टक ।
विविध भाषेत पदे अनेक ।
कविश्रेष्ठ मनोहर ॥१०९॥

प्रभुभक्ती आणि प्रभुवियोग उत्कट ।
प्रामुख्याने दिसतसे मनोहर काव्यांत ।
इतक्या लहान वयांतही वेदांत ।
मनोहरपदांतूनी झळकत ॥११०॥

स्वामीसमर्थ वदति भक्तांस ।
अक्कलकोटाहून माणिक नगरास ।
बडे भाईस जा भेटण्यास ।
बडा भाई मनोहरप्रभु ॥१११॥

व्यवहार करावा नियमित ।
तैसाच करावा वेळेत ।
कारभारात चोख अत्यंत ।
होते प्रभु महाराज ॥११२॥

होता सात्विक आहार ।
विद्वज्जनांवर प्रेम अपार ।
संतोषोनि देती उपहार ।
दानशूर प्रभुमनोहर ॥११३॥

प्रभुमंदिरावर कळस जरी सोन्याचा ।
आधी मान मनोहरप्रभुंच्या समाधीचा ।
पाया असे विराट प्रभुमंदिराचा ।
आधारभूत जो ॥११४॥

ऐसा अवतार प्रभुमनोहर ।
ब्रह्मचारी विद्वान सुकुमार ।
सवाई माणिक खरोखर ।
हाच गा ॥११५॥