आज अशे अनेक सौभाग्यशाली लोक आहेत ज्यांनी प्रत्यक्षरूपाने श्री सद्गुरु सिद्धराज माणिकप्रभु महाराजांचे दर्शन घेतले आणि महाराजांच्या दिव्य सत्संगाचा लाभ मिळविला. महाराजांच्या सान्निध्यात राहिलेले – वावरलेले आज कितीतरी लोक आहेत, ज्यांना वेगवेगळ्या काळी निरनिराळ्या प्रकाराने महाराजांच्या दैवी सामर्थ्याची प्रचीती अनुभवण्यास मिळाली. नवीन लोकांना बाहेरून बघतांना आमचे महाराज जरी अगदी साधारण माणसासारखे दिसत होते परंतु आतून त्यांचे खरे स्वरूप किती दिव्य आणि विराट हाते हे अनुभवण्याचा सौभाग्य ज्या प्रभुभक्तांना मिळाला तेच खरे सौभाग्यशाली होत.

माझे वैय्यक्तिक सौभाग्य म्हणजे मला जन्मापासून नव्हे तर जन्माच्या आधीपासूनच महाराजांची छत्रछाया लाभली. त्यांच्यावर माझे अपार प्रेम आणि श्रद्धा बाल वयापासून होती. लहानपणापासूनच माझ्या मनावर महाराजांच्या भव्य व्यक्तित्वाचा प्रभाव पडला होता. मुबंईकर प्रभुभक्तांकडून अनेक वेळेला महाराजांच्या शक्तीने कशे चमत्कार घडले आणि महाराजांची त्यांच्यावर कशी कृपा झाली हे सर्व ऐकत होतो. या गोष्टी मला खूप रोमांचित करायचे. महाराजांच्या उजव्या हातात एक सोन्याचा कडा असायचा, जो आज श्रीज्ञानराज महाराजांच्या हातात आहे. अगदी वयाच्या ८-१० वर्षा पासून मला अस वाटयचं  की महाराजांची शक्ती बहुतेक त्या कड्यात आहे. हा विचार मी कधीही कोणापुढे व्यक्त केला नव्हता. चक्क आई वडलांना सुद्धा नाही. फक्त माझ्या मनांत ठेवायचो आणि जेव्हां महाराजांचे दर्शन व्हायचे तेव्हां मनोमनी त्या कड्याला नमन करायचो. दर वर्षा प्रमाणे मी सन्‌ १९७६ सालच्या दत्त जयंती उत्सवा साठी माणिकनगरला गेलो होतो, त्या वेळी मी १८ वार्षाचा होतो. नेहमी प्रमाणे लोकांना दर्शन देण्यासाठी महाराज बैठकीत बसलेले होते आणि मी तिथे एका बाजूला थांबलो होतो. उपस्थित मंडळीशी कुठल्यातरी विषयावर महाराजांची चर्चा चालली होती अचानक चर्चेत महाराजांच्या हातातल्या कड्याचा संदर्भ निघाला. माझे लक्ष अचानक त्यांच्या संभाषणाकडे गेले. महाराज त्या लोकांना म्हणाले, ‘‘काही लोकांना वाटते की माझी शक्ती या कड्यात आहे. पहिली गोष्ट, माझ्याकडे कुठलीही शक्ती-फक्ती काही ही नाही. ती शक्ती या पीठाची, या जागेची आणि या गादीची आहे. ती सत्ता प्रभूंची आहे आम्ही फक्त माध्यम आहोत.’’ मी चकितच झालो आणि महाराजांचे ते वाक्य ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. मी कधीही महाराजांसमोर कड्याचा विषय काढलाच नव्हता. माझा विचार माझ्याच मनातच असायचा, तरीही हा विचार ओळखून महाराजांनी माझा भ्रम दूर केला. मला अप्रत्यक्षरूपाने उद्देशून काहीही न बोलता वेळ साधून माझा भ्रम दूर केला. त्या क्षणाला मलाच माझ्या मूर्खतेवर हसू आले आणि महाराजांनी रचलेल्या पदाच्या एका ओळीच्या अर्थाचा बोध झाला ‘‘ही जीवन नौका आमुची। प्रभु आज्ञा जलवर तरती।।’’

असे होते आमचे सद्गुरु श्रीसिद्धराज माणिकप्रभु महाराज. साक्षात्‌ सिद्ध पुरुष! काहीही उघड न दाखवता आपल्या मनातले ओळखायचे आणि मौनपणें सर्व संशयाचे निरसन करून टाकायचे – ‘‘गुरोस्तु मौनं व्याख्यानं शिष्यास्तु छिन्न संशया:।।’’

[social_warfare]